![]()
आषाढी वारी-२०२६ दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्यातील आशा स्वयंसेविकांमार्फत व्यापक आरोग्य जनजागृती राबविण्याचे निर्देश आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संजय काटकर यांनी दिले आहेत. पंढरपूर आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा सोहळा असून, या काळात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. गर्दी, प्रवास, बदलते हवामान तसेच संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वारकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आशा स्वयंसेविका या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा आधारस्तंभ असून, त्यांनी गावपातळीवर बैठका, घरभेटी, समूह संवाद तसेच आयईसी (IEC) साहित्याच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. वारीदरम्यान उपलब्ध असलेल्या आरोग्य शिबिरांची माहिती, आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा, स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याची काळजी, सुरक्षित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर, उष्माघात, निर्जलीकरण व अतिसारापासून बचाव, हात स्वच्छ धुण्याची सवय, संसर्गजन्य आजारांची लक्षणे दिसल्यास तात्काळ आरोग्य संस्थेशी संपर्क तसेच आवश्यक औषधे व वैयक्तिक आरोग्य साहित्य सोबत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना काटकर यांनी दिल्या आल्या आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, गर्भवती माता, लहान मुले आणि इतर संवेदनशील गटांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांच्या प्रभावी जनजागृतीमुळे वारकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल आणि “निरोगी वारी, सुरक्षित वारी” हा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
Source link
आषाढी वारीत आशा स्वयंसेविकांमार्फत आरोग्य जनजागृती:आरोग्य विभागाच्या सूचना, निरोगी वारी सुरक्षित वारीचा संदेश