![]()
पापरी (ता. मोहोळ) येथील उजनी डाव्या कालव्यावरील पादचारी पुलाची तीन-चार महिन्यांपूर्वी केलेली दुरुस्ती निकृष्ट झाल्याने हा पूल पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व दूध व्यावसायिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत अ
.
पापरी येथील टेकळे वस्ती भागातून १९७८ मध्ये मुख्य उजनी डावा कालवा गेला आहे. कालव्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने किलोमीटर १०२ मध्ये लोखंडी पादचारी पूल बांधण्यात आला होता. या पुलाला आता ४६ वर्षांचा कालावधी लोटला असून त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी पत्र्याचे वेल्डिंग तुटल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पाटबंधारे विभागाने डागडुजी केली. मात्र, नवीन पत्रा अत्यंत पातळ वापरल्याने आणि त्याला खालून आधार नसल्याने तो दुमडून पुन्हा धोकादायक बनला आहे.
सध्या उजनी कालव्यातून पाणी वाहत असून पुलाचा पत्रा खचल्याने मोटरसायकलचे चाक त्या खड्ड्यात अडकत आहे. या पुलावरून तुंगतला जाणारे दूध व्यावसायिक, मजूर, भाजीपाला विक्रेते आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. जनावरांना घेऊन जातानाही शेतकऱ्यांची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे हा पूल तातडीने दुरुस्त करून तिथे ट्रॅक्टर जाण्याइतपत क्षमतेचा सिमेंटचा पूल उभारावा, अशी मागणी जोर धरत आहे. ^तीन महिन्यांपूर्वी दुरुस्त केलेल्या पुलाचा पत्रा खालून आधार नसल्याने निघाला आहे. वेल्डिंग निघाल्याने तो खाली खचला असून पशुधनाला घेऊन शेतात जाताना मोठी कसरत करावी लागते. वारंवार दुरुस्ती करण्यापेक्षा येथे कायमस्वरूपी सिमेंट पूल उभारावा. — प्रथमेश टेकळे, शेतकरी
उजनी कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाला माहित असते. पूल धोकादायक असतानाही कालवा कोरडा असेपर्यंत काम का पूर्ण केले गेले नाही? असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. आता कालवा भरून वाहत असताना दुरुस्ती करणे अधिक जिकिरीचे आणि धोकादायक बनले आहे.
नवीन पूल बसवणार ^टेकळे वस्ती परिसरातील ग्रामस्थांशी पादचारी पुलासंदर्भात चर्चा झाली आहे. नवीन पत्रापुलासंदर्भात इस्टिमेट फाईल केले आहे. कालव्याचे पाणी बंद झाले की जुना लोखंडी पूल पूर्णतः स्क्रॅपमध्ये काढून तिथे क्रेनच्या सहाय्याने तयार केलेला नवीन पूल बसविण्यात येईल. — जितेंद्र बंकापुरे, अभियंता (पाटबंधारे विभाग, तुंगत शाखा)