Headlines

एआयसाठी नियामक पद्धत निर्माण करा – विवेक सावंत:मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये अशी मागणी




महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) नियामक पद्धत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. पुणे येथे आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’ या संवाद सत्रात ते बोलत होते. एआयने मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकेसह जगभरात एआय आणि डेटा सेंटरला विरोध होत असून, भारतातही नागरी समाजाने या तंत्रज्ञानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आंदोलने या प्रगतीला थांबवू शकत नाहीत, परंतु तिला योग्य आकार देऊ शकतात, असे मत सावंत यांनी व्यक्त केले. जनआंदोलन, दबाव गट, चिंतन गट, डिजिटल हस्तक्षेप आणि कायदेशीर कारवाई यांसारख्या प्रतिकाराचे स्वरूप असू शकते, असेही ते म्हणाले. एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनने महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त हे संवाद सत्र आयोजित केले होते. फाऊंडेशनच्या नवी पेठ येथील प्रशिक्षण सभागृहात शनिवारी सायंकाळी हे सत्र पार पडले. यावेळी विवेक सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान आणि सत्यशोधनाच्या प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शन केले. सावंत यांनी ‘तथ्यच बनावट असेल तर सत्य कसे शोधणार?’ हा प्रश्न उपस्थित केला. ज्ञानग्रहणातून सत्याकडे जाण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सत्याचा पाया भुसभुशीत झाला असून, वस्तुनिष्ठ सत्याचा विलय होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गोबेल्सनीती, भावनिक आवाहन आणि संमोहन यामुळे सत्य व असत्यातील फरक धूसर होत असून, यातून अराजकतेचा धोका निर्माण होऊ शकतो, असे सावंत म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हल्लेखोरांचे काम सोपे झाले असून, संरक्षकांचे काम अवघड झाले आहे. डीप फेक व्हिडीओ ओळखण्याची पद्धत विकसित करून अशा व्हिडिओंवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे माहितीचे उत्पादन आणि प्रसारण अभूतपूर्व वेगाने होत आहे. त्यामुळे कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची पडताळणी करणे आणि विवेकवादी दृष्टिकोन बाळगणे अत्यंत आवश्यक आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञान हे केवळ एक साधन असून, त्याचा वापर समाजहितासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी कसा करायचा, हे ठरविण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोग, मर्यादा, चुकीची माहिती पसरवण्याची शक्यता आणि डिजिटल साक्षरतेचे महत्त्व यावरही भर दिला. सत्यशोधनाची परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विविध तज्ज्ञांचा संदर्भ दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *