![]()
नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील नागरेवस्ती परिसरातील बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला आणि तिच्यासोबत गेलेल्या तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. मनीषा विजय रामजोशी (२८), मुलगा कार्तिक विजय रामजोशी (११), तसेच तिचे भाचे आदित्य राहुल शिंदे (७) आणि अविनाश राहुल शिंदे (८, सर्व रा. वडारपुरा, डिग्रस, जि. यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत. काही वेळच्या प्रयत्नांनंतर चारही जणांचे मृतदेह एकापाठोपाठ एक पाण्याबाहेर काढण्यात आले. डिग्रस येथील हे कुटुंब नाली खोदकामाच्या रोजगारासाठी पुणे येथे जाण्यास निघाले होते. सर्वजण दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यांच्या पाठीमागून कुटुंबातील आणखी काही सदस्य येणार असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वीच नांदूरशिंगोटे परिसरातील एका खुल्या मैदानात राहुटी ठोकून तात्पुरता मुक्काम केला होता. कपडे व चपलांवरून संशय बळावला शनिवारी दुपारी मुक्कामाच्या ठिकाणाजवळील नागरे बंधाऱ्यावर मनिषा कपडे धुण्यास गेल्या होत्या. सोबत मुलगा कार्तिक आणि भाचे आदित्य व अविनाश हेही पोहण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही चौघेही राहुटीवर न परतल्याने विजय रामजोशी आणि राहुल शिंदे यांनी बंधाऱ्याच्या दिशेने धाव घेतली. बंधाऱ्याच्या काठावर कपडे आणि चपला दिसल्याने त्यांना संशय आला.
Source link
कपडे धुण्यास गेलेल्या महिलेसह 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू:नांदूरशिंगोटेतील दुर्घटना, डिग्रसच्या कुटुंबावर ओढवला बिकट प्रसंग