Headlines

'कॉकरोच पार्टी'तर्फे पुण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन:राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक प्रश्नांवर लक्ष वेधणार




सामाजिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासह नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि देशप्रेमाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ‘कॉकरोच पार्टी’च्या वतीने पुणे शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शनिवारवाडा येथून या रॅलीला सुरुवात होणार असल्याची माहिती आयोजक अनिकेत देशमाने आणि अर्चना शाह यांनी दिली. शनिवारवाडा येथून सुरू होणारी ही तिरंगा रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. रॅलीदरम्यान मार्गावर असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. देशातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला आणि युवकांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. मणिपूरमधील हिंसाचार, महिलांवरील अत्याचार तसेच देशातील वाढती सामाजिक अस्वस्थता याबाबत केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही रॅलीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जात, धर्म आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. रॅलीमध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिक सहभागी होणार आहेत. सहभागी नागरिकांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने ही रॅली होणार असून त्याचे पालन सर्वांनी करावे. अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा, असे आवाहन कॉकरोच पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *