![]()
महाराष्ट्रातील कर्तबगार नेतृत्वाने देशाचे पंतप्रधान व्हावे, ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. मागील काळात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांना या पदाने हुलकावणी दिली. मात्र, सध्याच्या घडीला राज्यात देवेंद्र फडणवीस हेच एकमेव नेते आहेत, जे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. त्यांनी आत्ताच पंतप्रधान व्हावे असे आमचे म्हणणे नाही, पण भविष्यात महाराष्ट्राला ही संधी मिळावी यासाठी मी पंढरपूरच्या विठुरायाला साकडे घातले आहे, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले, तर राज्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी करावे, असे वाटणे अत्यंत स्वाभाविक असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले. दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आगामी मंत्रिमंडळ विस्तार, अर्थखाते आणि जयंत पाटील-फडणवीस यांच्या भेटीवर पक्षाची भूमिका मांडली. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावे देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रवारीच्या चर्चांवर बोलताना भरणे म्हणाले, महाराष्ट्रातील नेत्याने देशाचे नेतृत्व करावे ही जनतेची भावना योग्य वेळी पूर्ण होईल, असा मला विश्वास आहे. फडणवीस केंद्रात गेल्यानंतर महाराष्ट्राची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांभाळावी, असे मला वाटते. सुनेत्रा वहिनी आमच्या सर्वोच्च नेत्या आहेत, त्यामुळे त्यांनी राज्याच्या मुख्य पदावर विराजमान व्हावे, अशी इच्छा असणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीने साहजिक आहे. अर्थखात्याची मागणी कायम अजित पवार यांच्या निधनानंतर प्रलंबित असलेल्या अर्थखात्यावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, अर्थखाते अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले नाही, मात्र आम्ही तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आगामी काळात यावर काय निर्णय होतो, ते पाहू. दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरचे ‘जिओ टॅगिंग’ करण्याचे कोणतेही आदेश पक्षाने दिलेले नाहीत, असे स्पष्ट करत भरणे म्हणाले की, अजितदादा हे आमच्या सर्वांचे लाडके नेते होते. त्यांनी अनेकांना मदत केली आहे. त्यामुळे लोक स्वतःहून आदरापोटी त्यांचे बॅनर लावत आहेत, त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेणार राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य करताना कृषिमंत्र्यांनी सांगितले की, या संदर्भात महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सर्व नेते एकत्र बसून यावर योग्य तो निर्णय घेतील. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा या निर्णय प्रक्रियेत कुठेही सहभाग नाही. जयंत पाटील-फडणवीस भेटीवरून चर्चा नको दत्तात्रय भरणे म्हणाले की, माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट पूर्णपणे कामासंदर्भातील होती. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे यात काहीही गैर नाही. त्याचा राजकीय अर्थ काढून शरद पवार यांच्या पक्षातील कोणी एनडीएमध्ये येत असल्याचा दावा करणे चुकीचे आहे. जयंत पाटील यांनी स्वतः मतदारसंघातील कामासाठी ही भेट असल्याचे स्पष्ट केले आहे. शेवटी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अत्यंत मजबूत असून, त्यांना कोणीही अडचणीत आणू शकत नाही. पक्षातील सर्व लोक आणि आमदार सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,
Source link
चव्हाण, पवारांना हुलकावणी मिळाली; पण योग्य वेळी फडणवीस पंतप्रधान व्हावे:मुख्यमंत्री केंद्रात गेल्यास सुनेत्रा पवारांनी राज्याचे नेतृत्व करावे- दत्तात्रय भरणे