![]()
दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले. ते मंचावर येताच, ‘महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते आपल्यात आले आहेत’, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी देताच आंदोलकांनी एकच जल्लोष केला. या उत्साही वातावरणात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी युवाशक्तीला नमन करण्यासाठी आलो आहे. अभिजीतने ठिणगी पेटवली आहे. ही ठिणगी अशी विझणारी नाहीय. स्वातंत्र्यानंतर आम्ही पहिल्यांदा अनुभवत आहोत की, अशी सरकार आपल्या भविष्यावर लाठ्या चालवत आहेत, तुम्ही फक्त युवा नाहीत तर या देशाचे भविष्य आहात. मी धन्यवाद देऊ इच्छितो. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हा देश कॉक्रोचने बनलेला नाही. क्रांतिकारकांनी त्यावेळी संघर्ष केला नसता तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते. त्यावेळी काही लोक क्रांतीकारकांना आतंकवादी म्हणायचे. आता मला असेच वाटत आहे, जो आपल्याला आतंकवादी मानत आहेत ते विदेशातून आले आहेत का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे म्हणाले, आपण अनुभव घेत आहात की, किती अमानुषपणे हे सरकार तुमच्यासोबत वागत आहे. ज्याप्रकारे तुम्हाला मारहाण केली, पण एक गोष्ट चांगली वाटली की, आपल्या हातात मोबाईल फोन आहे. मी कालपासून पाहत होतो की, काही गुंड आपल्यावर लाठ्या चालवत होते. अभिजीतने एका गुंड्याचा फोटो व्हायरल केला आहे आणि म्हटले आहे वॉन्टेड आहे. उद्या तुमच्यापैकी भरपूर लोक खुर्चीवर बसणार आहेत तसेच आज ते लोक खुर्चीवर बसले आहेत. पण उद्या तुमच्यापैकी भरपूर लोक खुर्चीवर बसणार आहेत. तेव्हा बघून घेऊ. त्यांना माहिती नाही की, येणारा भविष्यकाळ माझ्यासमोर उभा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी युवा आंदोलकांना प्रोत्साहन दिले. आता आपला तप सुरु झाला आहे उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. ते गाणं लक्षात ठेवा, जरा याद करो कुर्बानी.. माझ्या देशाचे विद्यार्थी पेपरफुटीमुळे आत्महत्या करत आहेत. त्यांना लक्षात ठेवावे लागेल. निवडणुकीसाठी दोन-तीन वर्षे आहेत. असूद्या. याचा अर्थ आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आता आपला तप सुरु झाला आहे. सत्ताबदल करावी लागेल. केवळ एकाला बाहेर काढले तरी होणार नाही. पूर्ण सिस्टीम बदली करावी लागेल. जोपर्यंत सरकार बदली करणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात बदल होणार नाही. वन नेशन, वन इमोशन आहे महाराष्ट्र आपल्यासोबत उभा आहे. मला अभिमान आहे की, महाराष्ट्राचा तरुण आपले नेतृत्व करत आहे. मी सर्वांना हिंमत आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. तसेच आपल्याकडून हिंमत घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही दाखवलेल्या हिंमतीला मी वंदन करायला आलो आहे. जे धर्माच्या नावाने भिंती उभे करु इच्छित होते ती भींत आता तुटली आहे. संपूर्ण राष्ट्राची भावना एक आहे. वन नेशन, वन इमोशन आहेत. या भावनेसोबत आम्ही आपल्यासोबत शेवटपर्यंत उभे राह, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
Source link
जंतरमंतरवरील आंदोलनात उद्धव ठाकरेंची हजेरी:म्हणाले- देशाच्या भविष्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला उलथवून टाका