![]()
जिल्ह्यातील २२ हजार ४०० शेतकऱ्यांना कृषी साहित्य फक्त कागदावर वाटप करून २१ कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एक गुंठाही शेती नाही तसेच मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर करत त्यांना हे कृषी साहित्य वाटप करण्यात आले असे कागदावर दाखवण्यात आले आहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आली आहे, त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत. ज्या शेतकऱ्यांना साहित्य वाटप केल्याचे दाखवले आहे, त्यांचा ‘दिव्य मराठी’ने शोध घेतला असता काही शेतकरी मृत तर काही शेतकरी भूमिहीन असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांना साहित्यच मिळालेले नाही. ते फक्त कागदावर दाखवले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मोफत बियाणे, बीज प्रक्रिया औषधे वितरित करण्याची सरकारची योजना आहे. त्याअंतर्गत २०२५-२०२६ मध्ये हा गैरव्यवहार करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह एकूण १७ जणांचा यात सहभाग असल्याचा संशय आहे. काही ॲग्रो प्रोड्युसर कंपन्यांना हाताशी धरून हा गैरव्यवहार करण्यात आला आहे. त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. अर्ज न करताही लाभार्थी बनवले साहित्य वाटपाच्या लाभार्थींमध्ये माझे नाव कसे आले याची मला कल्पना नाही. कृषी साहित्यासाठी मी कुठेही अर्ज केला नव्हता. मला साहित्यही मिळालेले नाही. चौकशी समितीला याबाबत माहिती दिली. -रंगनाथ कदम, शेतकरी, भानसगाव. १७ जणांविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रस्ताव दिला चौकशीत ८ तालुका कृषी अधिकारी, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, १ मंडळ कृषी अधिकाऱ्यासह १७ जणांचा यात सहभाग आढळला आहे. कारवाईचा प्रस्ताव पाठवला आहे. -महेश तीर्थकर, कृषी उपसंचालक, लातूर विभाग नियम: कंपन्यांच्या शिफारशीने लाभ ॲग्रो प्रोड्युसर कंपन्यांमार्फत लाभार्थींची शिफारस केली जाते.नंतर कृषी विभाग कृषी साहित्य वाटप करतो. भूमिहीनांना कृषी साहित्य दिले जात नाही. असे असताना भूमिहीनांना तसेच मृतांच्या नावे साहित्य वाटप करण्यात आले.
Source link
धाराशिव जिल्ह्यात गैरव्यवहार:22,400 शेतकऱ्यांना कागदोपत्री कृषी साहित्य, 21 कोटींचा घोटाळा