![]()
सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक आणि बलाढ्य विचारसरणी स्वीकारावी, असे आवाहन प्रेरणादायी वक्ते आणि लेखक दत्तात्रय वारकड यांनी केले. येथील जिल्हा कोषागार कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘जीवनातील ताणतणावापासून मुक्ती व आनंदी जीवन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी अप्पर कोषागार अधिकारी कुशाबा पिसे, रवींद्र काजळकर, संतोष ताठे, सहाय्यक कोषागार अधिकारी राजकुमार पुंड (नेवासे) व सुधीर देशपांडे आदी उपस्थित होते. वारकड म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या युगात मानव भौतिक सुखाच्या मागे धावताना स्वतःलाच विसरला आहे. जगातील कितीही मौल्यवान वस्तूंचा उपभोग घेतला, तरी शांत झोप आणि निरोगी शरीर हेच खऱ्या आनंदी जीवनाचे गमक आहे. “असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर… या कवी कुसुमाग्रजांच्या ओळींचा दाखला देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आव्हानांना न डगमगता सामोरे जाण्याचा मंत्र वारकड यांनी देताच श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. जीवनात स्थैर्य हवे असेल तर धैर्य धरणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनात मनःशांती जपण्याचे तंत्र त्यांनी मांडले. व्याख्यानाला कोषागार कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदर्शांचा वारसा जोपासण्याची आज खरी गरज संत ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांच्या विचारांचा सांस्कृतिक वारसा आपण अंगीकारला पाहिजे. हीच आदर्श शिकवण भावी पिढीला देणे ही काळाची गरज आहे, असे वारकड म्हणाले.
Source link
नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक विचारसरणी स्वीकारा:जिल्हा कोषागार कार्यालयात दत्तात्रय वारकड यांचे आवाहन