Headlines

नांदेडमध्ये शिवसेनेला मोठे बळ:एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश




नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले असून, शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना त्यांच्या पाठीशी शिवसेना आणि आपण स्वतः ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. नाळेश्वर, राहटी आणि पिंपळगाव (कोरका) यांसह नांदेड जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. नाळेश्वर येथील माजी जिल्हा परिषद सभापती नरहरी ठाकराम वाघ, माजी सरपंच रुपेश केशवराव वाघ, ग्रामपंचायत सदस्य बालाजी व्यंकटी इंगोले, ग्रामपंचायत सदस्य बालाजी दत्ता भारती, शालेय व्यवस्थापन समितीचे बळीराम उत्तम वाघ यांचा प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. राहटी येथील भोजराज वामनराव बोकारे, रावसाहेब नागोराव बोकारे, गोविंद पुंडलिक बोकारे, भागवत एकनाथ बोकारे, लक्ष्मण भानुदास बोकारे आणि रतन संभाजी बोकारे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. तसेच पिंपळगाव (कोरका) येथील नागेश व्यंकटराव बडवणे, जि. प. सदस्य बाळगीर खुशालगिरी गिरी महाराज, दत्तरामजी गणेशराव बडवणे, बालाजीराव माधवराव डुकरे, रावसाहेब दत्तरामजी सूर्यवंशी आणि गोविंदराव रावण जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. या पक्षप्रवेशासाठी संपर्क प्रमुख रमाकांत मढवी यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही समन्वय साधला. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना शिंदे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “तुम्ही सर्व कार्यकर्ते आलात. तुमच्या पाठीशी बालाजी कल्याणकर स्वतः आहेतच; पण बालाजी कल्याणकर यांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे. सगळ्यांच्या पाठीशी मी स्वतः आहे, शिवसेना आहे,” असे शिंदे म्हणाले. कल्याणकर यांच्या मतदारसंघात विकासकामे झाली, जनतेला न्याय मिळाला आणि लोकांचे प्रश्न सोडवले गेले. त्यामुळेच मतदारसंघातील जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले, असे सांगत शिंदे यांनी कल्याणकर यांच्या कामाचे कौतुक केले. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला आशीर्वाद दिला असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीला आदर्श मानून शिवसेनेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शंकरअण्णा धोंडगे यांच्या कार्याचा उल्लेख
ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांच्याशी केला. धोंडगे यांनी शेतकरी नेते शरद जोशी यांच्यासोबत काम केले असून, यापूर्वी लोहा येथे त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध भागांतील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने नांदेडमध्ये संघटनविस्ताराला आणखी वेग मिळाल्याचे शिंदे यांनी नमूद केले. “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” ही शिवसेनेची भूमिका असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे अनेक निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना, युवा प्रशिक्षण योजना आणि ज्येष्ठांसाठीच्या विविध योजना यांचा त्यांनी उल्लेख केला. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले आहेत. “दिलेला शब्द पाळणारी, दिलेला शब्द खरा करणारी आणि सर्वसामान्यांची शिवसेना” म्हणून जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यातून आणि तालुका-तालुक्यातून विविध पक्षांतील लोक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *