Headlines

पुण्यातील राजकीय नाट्य संपलं:अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड; सुनील टिंगरेंनंतर श्रीकांत पाटील यांचीही माघार




पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत अखेरचा सस्पेन्स संपुष्टात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मैदानात उतरलेले विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे पुण्यातील संभाव्य लढत टळली असून निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील 17 रिक्त विधान परिषद जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पुणे मतदारसंघातील ही सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 1 जून रोजी संपली होती. त्यानंतर 2 जूनला अर्जांची छाननी करण्यात आली. आज, 4 जून हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक ठिकाणी बंडखोरी, नाराजी आणि उमेदवारीवरून निर्माण झालेले वाद चर्चेत होते. विविध पक्षांचे वरिष्ठ नेते बंडखोरांची मनधरणी करण्यात व्यस्त होते. अनेक ठिकाणी समेटाचे प्रयत्न सुरू असताना पुण्यातील राजकीय घडामोडींनी विशेष लक्ष वेधून घेतले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षाच्या आदेशानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विक्रम काकडे यांच्या विरोधात उभा राहणारा प्रमुख प्रतिस्पर्धी मैदानातून बाहेर पडला. श्रीकांत पाटील यांच्या माघारीमुळे पुण्यातील निवडणूक प्रत्यक्षात बिनविरोध होण्याचा मार्ग खुला झाला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सुनील टिंगरे यांनीही अर्ज मागे घेतला विशेष म्हणजे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील टिंगरे यांनीही आपला अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे पुण्यातील बहुचर्चित बंडखोरीचा अध्याय जवळपास संपुष्टात आला. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीवरून निर्माण झालेला तणाव आणि अंतर्गत नाराजी आता शांत झाल्याचे दिसत आहे. विविध स्तरांवर सुरू असलेल्या चर्चांनंतर पक्षांतर्गत मतभेद दूर करण्यात नेतृत्वाला यश आल्याचे चित्र आहे. त्यामुळे विक्रम काकडे यांच्यासाठी निवडणुकीचा मार्ग अधिकच सुकर झाला. पुण्यातील राजकीय हालचालींना वेग दरम्यान, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांची घेतलेली भेटही या घडामोडींमध्ये चर्चेचा विषय ठरली. त्या भेटीनंतरच पुण्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगली आहे. राज्यातील इतर मतदारसंघांमध्येही अनेक बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली असून पक्ष नेतृत्वाने नाराजांची समजूत काढण्यात यश मिळवले आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून विक्रम काकडे यांच्या विजयाची केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *