Headlines

प्रशांत भूषण म्हणाले- AI मुळे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला मर्यादा:मानवी कुतूहल, तार्किकता जपण्याचे आवाहन; दाभोलकर स्मृती व्याख्यान




सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगाने प्रगतीमुळे मानवी जीवनात क्रांती होत असली तरी, कुतूहल, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किकता या मानवी मूल्यांचे महत्त्व भविष्यात अनन्यसाधारण राहील. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित वार्षिक स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. भूषण यांनी स्पष्ट केले की, या तंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्येही याबद्दल जाणीव आणि आत्मपरीक्षण वाढत आहे. आपण आपली तार्किकता आणि संवेदनशीलता तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ देऊ नये, यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी तंत्रज्ञान आणि जाहिरात तंत्राचा वापर लोकांच्या मनात अवैज्ञानिक गोष्टींचा अपप्रचार करण्यासाठी करतात, यापासूनही सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ॲड. प्रशांत भूषण यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहा अनुवादित पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. राही डहाके यांनी या मराठी पुस्तिकांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे. भूषण पुढे म्हणाले की, सध्या तार्किक विचारसरणीला तिलांजली देऊन सत्ताधारी वर्गाचे अंधभक्त निर्माण करण्यावर जोर दिला जात आहे. सत्तेच्या सर्वोच्च स्थानावरील व्यक्ती अवैज्ञानिक आणि खोट्या गोष्टी पसरवत आहेत. कोरोना काळात थाळी वाजवल्याने किंवा पापड खाल्ल्याने कोरोना जातो, अशा अवैज्ञानिक गोष्टी सत्ताधारी पक्षाने पसरवल्याचा आरोप त्यांनी केला. याचा परिणाम शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक वातावरणावर होत आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मंडीचे संचालक भूत-प्रेत अस्तित्वात असल्याचे आणि मांस खाल्ल्याने भूस्खलन होत असल्याचे अवैज्ञानिक विधाने करत आहेत. अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत आणि पिरिओडीक टेबल हटवून त्याऐवजी फलज्योतिषासारख्या अवैज्ञानिक गोष्टींचा समावेश केला जात असल्याबद्दल भूषण यांनी तीव्र टीका केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. डॉ. दाभोलकर, प्रा. कलबुर्गी, कॉम्रेड पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी व गुन्हेगार जामिनावर मुक्त असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या कार्यक्रमाला अंनिस ट्रस्टचे दीपक गिरमे, गणेश चिंचोले, राहुल थोरात, मुक्ता दाभोलकर, प्रभाकर नानावटी, प्रवीण देशमुख, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले, तर मिलिंद देशमुख यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *