![]()
प्रतिनिधी |जामखेड शासकीय घरगणनेच्या त्रुटींमुळे भटके-विमुक्त समाजाचे वास्तव चित्र समोर येत नसल्याने, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात व्यापक ‘मुशाफिरी यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भटके-विमुक्त नेते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला ग्रामीण विकास सचिव उमा जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, संतोष चव्हाण, रेश्मा बागवान, ललिता पवार, भक्ती पवार, कीर्ती पवार, भाविका टिकार, श्रुती थोरात, साहिल जाधव आदी उपस्थित होते. ॲड. डॉ. जाधव यांनी प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले. ते म्हणाले की, भटके-विमुक्त समाजातील नागरिक पाल, कुड किंवा कोपी स्वरूपातील तात्पुरत्या निवाऱ्यात राहतात. मात्र, सध्याच्या शासकीय ऑनलाईन घरगणना प्रक्रियेत अशा निवाऱ्यांसाठी कोणताही स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे हजारो नागरिक या प्रक्रियेतून वंचित राहत आहेत. भटके-विमुक्त हे या देशाचे नागरिक नाहीत का? त्यांची अचूक घरगणना आणि जनगणना झाली नाही, तर त्यांच्या लोकसंख्येचा आकडा कसा समोर येणार? लोकसंख्याच माहीत नसेल तर त्यांच्या विकासाचे बजेट, कल्याणकारी योजना आणि निधीचे नियोजन सरकार कसे करणार, असे जाधव म्हणाले. उपजीविकेसाठी सतत भटकंती करावी लागत असल्यामुळे या समाजाच्या जनगणनेत मोठ्या अडचणी येतात. संविधानाने दिलेले अन्न, वस्त्र आणि निवारा हे मूलभूत अधिकार भटके-विमुक्तांना मिळावेत यासाठी ही ‘मुशाफिरी यात्रा’ मैलाचा दगड ठरणार आहे. ही यात्रा अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ८ जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे. या दौऱ्यात सुमारे ११० गावांना भेटी देऊन भटके-विमुक्त समाजाच्या वस्त्या, पाल आणि वाड्यांवर थेट संवाद साधला जाईल. समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, घरगणना व जनगणनेबाबत त्यांच्यात जागृती निर्माण करणे आणि त्यांच्या मागण्या शासनापर्यंत आक्रमकपणे पोहोचवणे.
Source link
भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी आठ जिल्ह्यांत "मुशाफिरी यात्रा'