Headlines

भातकुली पंचायत समितीची इमारत गळकी:सीईओ गांधींना आला अनुभव, नवीन दालनासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश




भातकुली तालुक्यासाठी अमरावती येथे असलेल्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत लवकरच बदलणार आहे. ही इमारत फार जुनी झाल्याने मोडकळीस आली आहे. सध्या ती गळकी इमारत म्हणून ओळखली जात असून, पाणी गळण्याचा अनुभव खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनाही आला आहे. यामुळे इमारत बदलण्याच्या कामाला गती मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी नुकतीच या कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यांनी कार्यालयीन कामकाज, उपलब्ध भौतिक सुविधा आणि विविध विभागांच्या कार्यप्रणालीची सखोल पाहणी केली. याच भेटीदरम्यान त्यांना इमारतीच्या गळतीचा अनुभव आला. गटविकास अधिकारी श्रीमती तृप्ती दुरुगकर आणि इतर अधिकारी या भेटीदरम्यान उपस्थित होते. पंचायत समितीची इमारत जुनी व जीर्ण अवस्थेत असून, अनेक ठिकाणी छत नादुरुस्त झाल्याने पावसाळ्यात गळती होत असल्याची माहिती बीडीओ दुरुगकर यांनी दिली. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. गांधी यांनी सामान्य प्रशासन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पशुसंवर्धन विभाग, बांधकाम विभाग, लेखा विभाग, उमेद अभियान, समग्र शिक्षा अभियान, पंचायत समिती सभागृह तसेच इतर विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. याशिवाय पंचायत समितीच्या संपूर्ण बाह्य परिसराची पाहणी करून तेथील शिक्षण विभाग कार्यालय, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा कृषी विभाग कार्यालय तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थानांचीही सविस्तर माहिती घेतली. पाहणीदरम्यान, त्यांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरणात काम करता यावे, यासाठी आवश्यक असल्यास तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी जागेवर बसण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, गटशिक्षणाधिकारी प्रेरक उजागरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय राठी, जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार यावले, सहाय्यक लेखाधिकारी सतीश माळवे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ममता वजीर, वरिष्ठ सहाय्यक नारायण चुकांबे तसेच पंचायत समिती भातकुलीतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समितीची कार्यालयीन जागा, इमारतीची दुरुस्ती, आवश्यक भौतिक सुविधा व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बसण्याच्या जागा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे त्यासंबंधीचा सविस्तर आणि वस्तुनिष्ठ प्रस्ताव तातडीने तयार करून जिल्हा परिषदेकडे सादर करावा, असे निर्देश सीईओ गांधी यांनी गटविकास अधिकारी श्रीमती तृप्ती दुरुगकर यांना दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *