![]()
स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका व गैरसमज दूर करून त्याचे प्रत्यक्ष फायदे सांगण्यासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे शनिवारी (25 जुलै) पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंढरपूर वारीचे औचित्य साधून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळानुरूप वीजमीटरच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली. “स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असून ग्राहकांचा प्रत्यक्ष वीजवापर जेवढा आहे, तेवढीच नोंद यामध्ये केली जाते. त्यामुळे बिलिंगच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे,” असे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. दैनंदिन वापराची माहिती व विद्युत सुरक्षेचे आवाहन यावेळी महावितरणचे मोबाईल ॲप डाऊनलोड करून देऊन नागरिकांना त्यांच्या दैनंदिन वीजवापराची माहिती दाखवण्यात आली. स्मार्ट मीटर हे स्वयंचलित पद्धतीने रीडिंग घेत असल्याने मानवी हस्तक्षेप टळतो आणि अचूक बिल मिळण्यास मदत होते. ज्या ग्राहकांना वीजबील वाढीव आल्याची शंका असेल, त्यांनी आपल्या घरातील अर्थिंग (Earthing) तपासून घ्यावी. तसेच विद्युत सुरक्षेसाठी आरसीसीबी (RCCB – Residual Current Circuit Breaker) बसवून घेण्यासंदर्भातही आवाहन करण्यात आले. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद नागरिकांनी स्मार्ट मीटरबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सर्व शंकांचे निरसन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले व या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक अभियंता रवी मिरगणे, विक्रांत खाडे, कनिष्ठ अभियंता विशाखा रणवरे व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Source link
महावितरणचा जागर:पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये 'स्मार्ट मीटर'बाबत व्यापक जनजागृती; ग्राहकांच्या शंकांचे निरसन