![]()
तालुक्यातील माणिकदौंडी ते बोरसेवाडी फाटादरम्यान हॉटेल शुभमजवळ राज्य मार्गावर एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पाथर्डीहून मिरजगावच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारचा अपघात होऊन कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. कालिदास शहादेव बनकर (३२) व बबन किसन खेतमाळीस (७०, दोघेही रा. मिरजगाव, ता. कर्जत) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अक्षय निलेश शिरसागर (२८) व उमेश मिटकरी (३८, दोघेही रा. मिरजगाव, ता. कर्जत) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा आल्ट्रॉझ कार (एमएच १४ एलजी ८४१६) ही पाथर्डीहून मिरजगावच्या दिशेने निघाली होती. माणिकदौंडी शिवारातील हॉटेल शुभमजवळ असलेल्या एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने कार वळणावर नियंत्रित होऊ शकली नाही आणि रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार उलटली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि दोन प्रवाशांचा जागीच जीव गेला. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल धनराज चाळक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे मिरजगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. नियमांचे सर्रास उल्लंघन ^ राज्य महामार्ग चांगला असल्यामुळे छोटी व मोठी वाहने वेगाने रस्त्यावरून धावतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नाहक नागरिकांचे बळी जात आहेत. वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करून याला आळा घालण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणावर व गावांच्या जवळ स्पीड ब्रेकर बसवणे गरजेचे आहे. -मारुती चितळे, नागरिक, चितळवाडी. ^भिगवण बारामती हा राज्यमार्ग रस्ता चांगला झाल्यामुळे गाड्या रस्त्यावरून सुसाट जात आहे. अनेक वाहन चालकांकडून वेग मर्यादेचे पालन केले जात नाही. वाहन चालकांनी जबाबदारीने वाहने चालवण्याची गरज आहे. भरधाव वाहनांना आळा घालण्यासाठी आणि अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी रस्त्यावर योग्य ठिकाणी गतिरोधक असणे अत्यंत आवश्यक आहे. – समीर पठाण, सरपंच, माणिदौंडी. स्थानिक नागरिकांची तत्परता अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी कारमध्ये अडकलेल्या जखमींना आणि मृतांना बाहेर काढले. सर्वांना तातडीने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी अक्षय शिरसागर व उमेश मिटकरी यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे.
Source link
माणिकदौंडी शिवारात भरधाव कारचा भीषण अपघात, 2 ठार:धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने घडला अपघात, दाेन जण जखमी