![]()
संजय राऊत हे राहुल गांधींची चाकरी करत असून पक्ष संपवण्याचं षडयंत्र रचत आहे. भविष्यात उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर मातोश्रीचे दरवाजे बंद असल्यामुळे खासदारांना दुसरीकडे जावे लागते. भविष्यात जनता देखील उबाठा गटासाठी दरवाजे बंद करेल असेही त्यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी आम्ही शरद पवार यांच्या वक्तव्याशी सहमत नाही असे वक्तव्य केले. उद्या हेच संजय राऊत आदित्य ठाकरेंच्या मताशी सहमत नाही आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही असे सांगायला कमी करणार नाही. सातत्याने राहुल गांधी यांची चाकरी करण्यासाठी आज त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली, उद्या ठाकरेंच्य विरोधात भूमिका घेण्यास ते कमी करणार नाही. उबाठाला खड्यात घालण्याची सुपारी संजय राऊत यांनी काँग्रेसकडून घेतली आहे. काँग्रेसकडून खंडणी घेत उबाठाला संपवण्याचे काम राऊत करत आहेत. मविआत एकमत नाही नवनाथ बन म्हणाले की, मविआमध्ये कोणत्याही विषयावर एकमत होत नाही. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच कोण मुख्यमंत्री होणार यावर त्यांचे एकमत होत नाही. मुळात मविआमध्ये बिघाडी आहे हे पहिल्या दिवसांपासून दिसून येत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलण्याचा अधिकार नाही नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पळ काढणारे नाहीतर देशाचे नेतृत्व करणारे आहेत. पळ काढणारे उद्धव ठाकरे होते त्यांना संधी मिळाली आणि घरी बसून सरकार चालवले ते पळपुटे आहेत म्हणून जनतेने त्यांना नाकारले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 3 वेळा जनतेने निवडून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेशी संवाद कसा साधायचा हे माहिती आहे ते थेट जनतेशी संवाद साधतात. उबाठा गटाचे सरकार असताना कार्टुनसाठी डोळा फोडणाऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलू नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणाऱ्या संजय राऊत आणि उबाठा गटावर नवनाथ बन यांनी जोरदार हल्ला चढवला. केतकी चितळे, निखिल भामरे आणि पत्रकारांवरील कारवायांचा उल्लेख करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा आरोप केला. राऊतच खरे देशद्रोही नवनाथ बन म्हणाले की, पत्रकार स्वातंत्र्यावर बोलण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कारवायांची आठवण ठेवावी. तुम्ही पाकिस्तान आणि बांगलादेशधार्जिणी भूमिका घेतात तुम्हीच खरे देशद्रोही आहात. केंद्र किंवा राज्य सरकारने कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन केले नाही.राऊतांचा भारतात, अमेरिकेत किंवा आंतरराष्ट्रीय कोर्टात विश्वास नसेल तर आता अंतराळात कोर्ट शोधावे असा टोलाही बन यांनी लगावला आहे.
Source link
राऊत आज पवारांविरोधात, उद्या उद्धव ठाकरेंविरोधातही बोलतील:राज्यसभेसाठी काँग्रेसची सुपारी घेऊन उबाठा संपवण्याचं काम- नवनाथ बन