Headlines

लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध; कलम 163 लागू:अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश




मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या संततधार पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत विशेष आदेश लागू केले आहेत. कलम 163 लागू करणे म्हणजे पर्यटनावर संपूर्ण बंदी नसून, सुरक्षेच्या कारणास्तव काही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. हे निर्बंध 6 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून 31 जुलैच्या सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशानुसार, पर्यटकांना आता धबधब्यांच्या ठिकाणी किंवा कोणत्याही धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास सक्त मनाई आहे. तसेच, अशा ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, व्हिडिओग्राफी करणे किंवा रिल्स बनवण्यावरही प्रशासनाकडून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. लोणावळ्यातील एकवीरा देवी, भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, तसेच लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग यांसारख्या किल्ल्यांवर व इतर पर्यटनस्थळांवर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे या भागात अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक निर्बंध लागू केले आहेत. पावसाळ्यातील पर्यटनाचा आनंद लुटताना नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. पर्यटकांवर लागू करण्यात आलेले प्रमुख निर्बंध खालीलप्रमाणे आहेत: – 6 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 31 जुलैच्या सकाळी 6 वाजेपर्यंत पर्यटनस्थळांच्या परिसरात कलम 163 लागू राहील.
– कोणत्याही नैसर्गिक धबधब्यांमध्ये प्रवेश करण्यास तसेच ओढे, नद्या आणि धरणांच्या पाण्यात उतरण्यास पर्यटकांना पूर्णपणे बंदी आहे.
– पर्यटनस्थळांवरील धोकादायक कड्यांवर किंवा दरीच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे तसेच व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
– पर्यटनस्थळी मद्यपान करणे, मोठ्या आवाजात गाणी लावून ध्वनीप्रदूषण करणे आणि उघड्यावर कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे.
– महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर आणि बेजबाबदारपणे किंवा अतिवेगाने वाहने चालवणाऱ्या चालकांवर प्रशासनाकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
– धरण आणि नदीकाठच्या परिसरात सुरक्षिततेच्या कारणास्तव चारचाकी आणि सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *