![]()
विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन प्रेरणा मिळावी, वाचनाची सवय लावणे, वाचन चळवळ रुजविणे व वाढविणे यासाठी जिल्ह्यातील शाळांमधून बुक डोनेशन कॅम्प आयोजित केला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी गुरुवारी तारीख 20 दिली आहे. जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील १३ शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेटीचे वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाणे, पुस्तक पेटी उपक्रमाचे प्रणेते अभिजीत जोंधळे, अभिजित लोहिया, शिक्षणाधिकारी मंजुश्री कल्लेवाड, उपशिक्षणाधिकारी आसावरी काळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक विपुल भागवत यांच्यासह विभाग प्रमुख इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड म्हणाली की, शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन उत्तम वाचक निर्माण झाला पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके वाचण्यात यावी या उद्देशाने विभाग प्रमुखांच्या पुढाकारातून पुस्तक पेटीचे वाटप करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. पुढील काळात जिल्ह्यातील शाळांमधून बुक डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी वाचून झालेली जुनी पुस्तके, संग्रहित केलेली पुस्तके बुक डोनेशन कॅम्पमध्ये जमा करावीत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके वाचनासाठी सहज उपलब्ध होतील. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त पुस्तके दान करण्याचे आवाहन केले. सध्या जिल्ह्यामध्ये सहामाही सराव परीक्षा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यात ६० हजार विद्यार्थ्यांची सकाळी दहा ते बारा या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळून भविष्यात ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता मिळवून सर्वोच्च यश संपादन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असल्यामुळे सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार पुस्तकाची निवड केली असून पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आवडेल अशी पुस्तके एका पेटीमध्ये एकत्रित करून पुस्तक पेटीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर आज २०० व्या पुस्तक पेटीचे वितरण केले असून, पुस्तक पेटी उपक्रम अंबाजोगाई ते परळी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात पसरला असल्याचे उपक्रमाचे प्रणेते अभिजीत जोंधळे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांनी मार्गदर्शन केले.
Source link
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवण्यासाठी ‘बुक डोनेशन कॅम्प':वाचन चळवळीला बळ देण्याचा सीईओ विवेक गायकवाड यांचा उपक्रम