![]()
राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळावा, तसेच आवश्यक शासकीय प्रमाणपत्रे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्यभर विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. शासनाच्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुका स्तरावर वस्तीनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एकाच ठिकाणी मिळणार विविध प्रमाणपत्रे या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना आवश्यक असलेली विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास दाखला, आयुष्मान भारत कार्ड, विवाह नोंदणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. या माध्यमातून अनेक वर्षांपासून आवश्यक कागदपत्रांपासून वंचित असलेल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे विमुक्त आणि भटक्या समाजातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे. पाच योजनांचा थेट लाभ प्रमाणपत्रांसोबतच या शिबिरांमध्ये विविध कल्याणकारी योजनांचा लाभही पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान योजना या पाच योजनांचा यामध्ये समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनांचे लाभ थेट हस्तांतरित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. वस्तीनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना अभियान सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने प्रत्येक वस्तीतील संभाव्य लाभार्थ्यांची यादी तयार करावी, तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिबिराच्या दिवशी पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानानंतरही उपक्रम नियमित स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार आहे. दर तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी अशा प्रकारचे अभियान आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तीन दिवसांच्या विशेष मोहिमेनंतरही विमुक्त व भटक्या समाजातील नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून नियमित शिबिरे घेतली जाणार आहेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रशासनाचा गौरव अभियानाच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा, तालुका आणि नगरपालिका प्रशासनाचा राज्य शासनाकडून विशेष गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र नागरिकांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासनाला प्रोत्साहन मिळणार आहे. या विशेष अभियानामुळे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना प्रमाणपत्रे, ओळखपत्रे आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हेही वाचा.. मुंबईत ठाकरे गटाला धक्का:शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा, उत्तर मुंबईत राजकीय समीकरणे बदलणार? उत्तर मुंबईतील राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशाची मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे उत्तर मुंबईत शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
Source link
विमुक्त-भटक्या समाजासाठी सरकारचा मोठा उपक्रम:27 ते 29 सप्टेंबरला मिळणार 11 प्रमाणपत्रे, 5 योजनांचा थेट लाभ