![]()
“प्रशासकीय खुर्चीत काम करताना जनताभिमुख निर्णय घेतल्यास त्याचे समाधान वेगळे असते. कर्तव्य बजावताना पदापेक्षा सेवेने आनंद मिळायला हवा. अशा सन्मानाची सेवापूर्ती खूप कमी लोकांच्या आयुष्यात येते आणि हा सन्मान मिळवण्यासाठी लोकाभिमुख कार्य पार पाडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार रवी सतवन यांनी केले. कर्जत पोलीस विभागातर्फे आयोजित सेवापूर्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कर्जतचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट आणि होमगार्ड पथकाचे सतीश सोनमाळी हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने कर्जत पोलीस विभागाच्या वतीने तिन्ही अधिकाऱ्यांवर पुष्पवृष्टी करत हलगीच्या निनादात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याला नूतन पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अक्षय जायभाये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पोलीस दलातील आव्हानांवर प्रकाश टाकत सेवानिवृत्तांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायम तत्पर राहून कायद्याच्या चौकटीत काम केल्यास जनता नेहमीच मान-सन्मान देते. माणूस कधीच सेवानिवृत्त होत नाही, तो कर्तृत्वाने समाजाच्या स्मरणात राहिला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम काळे यांनी केले, तर आभार मुन्ना पठाण यांनी मानले.
Source link
सन्मान मिळवण्यासाठी लोकाभिमुख कार्य महत्त्वाचे:तहसीलदार रतनव यांचे प्रतिपादन, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह तिघांना निरोप