Headlines

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 ठार:चंद्रपूरहून अमरावतीकडे येताना धामणगाव रेल्वेजवळ घटना




समृद्धी महामार्गावर रविवारी (28) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वेजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब चंद्रपूरहून अमरावतीकडे येत असताना ही दुर्घटना घडली. अपघातात भास्कर महादेव जीवने (65), महादेव जिवाजी जीवने (43), लताबाई महादेव जीवने (60), आरती भास्कर जीवने (41) आणि जिज्ञा भास्कर जीवने (12) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण चंद्रपूर शहरातील शासकीय डी.एड. महाविद्यालयामागील बहुपेठ परिसरातील रहिवासी होते. जीवने कुटुंबीय कारने समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. धामणगाव रेल्वेजवळील चॅनेज क्रमांक 105 परिसरात रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कार थेट उभ्या कंटेनरच्या मागील बाजूस धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारचा दर्शनी भाग पूर्णपणे कंटेनरमध्ये घुसला आणि अक्षरशः चक्काचूर झाला. यामुळे कारमधील पाचही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिस, महामार्ग पोलिस आणि जिल्हा वाहतूक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले, मात्र अपघाताची तीव्रता जास्त असल्याने कोणालाही वाचवता आले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती चंद्रपूरमध्ये पोहोचताच जीवने कुटुंबीयांच्या नातेवाईकांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *