![]()
पुणे शहरातील सारसबाग दोन दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने पुणे महानगरपालिका प्रशासन आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला. ऐतिहासिक सारसबाग २८ आणि २९ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) आणि महापालिका आयुक्तांचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून अधिकृत प्रसिद्धिपत्रक येण्यापूर्वीच महापौरांनी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया खात्यावरून याची घोषणा का केली, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला. चंदूशेठ कदम यांनी महापौरांवर निशाणा साधत म्हटले की, मंजूषा नागपुरे या भाजपच्या महापौर आहेत की संपूर्ण पुणे शहराच्या? घटनात्मक पदावरील व्यक्तीने प्रशासकीय निर्णयांचे श्रेय घेण्यासाठी किंवा राजकारणासाठी अशी घाई करणे अयोग्य आहे. सुरुवातीला बाग बंद ठेवण्यामागे दुरुस्तीचे कारण देण्यात आले होते, परंतु सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर सुरक्षेचे कारण पुढे करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे निर्णयामागील हेतूबाबत संशय निर्माण होत असल्याचे कदम म्हणाले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कारण पुढे करून सारसबाग बंद ठेवणे म्हणजे एका विशिष्ट समाजाला किंवा सणाला लक्ष्य करण्यासारखे असल्याची टीका कदम यांनी केली. सोशल मीडियावरील काही भ्रामक व्हिडिओंचा आधार घेत शहरातील वातावरण बिघडल्याचा आभास निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सारसबाग हे केवळ पर्यटनस्थळ नसून पुणेकरांच्या विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्याऐवजी पोलिसांनी आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवून बाग खुली ठेवायला हवी होती, असेही चंदूशेठ कदम यांनी स्पष्ट केले.
Source link
सारसबाग बंद निर्णयावरून काँग्रेसचा महापौरांवर हल्लाबोल:'भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न' म्हणत प्रश्नचिन्ह