![]()
सेनगाव तालुक्यातील सुकळी गावाजवळ प्रस्तावित असलेला सुमारे 1434.36 कोटी रुपयांचा सुकळी साठवण तलाव प्रकल्प तात्काळ रद्द करून येलदरी धरणातून कालवा काढत सेनगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे. सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द, सुकळी बु., दाताडा खुर्द, दाताडा बु. आदी परिसरातील शेतकऱ्यांचा प्रस्तावित सुकळी साठवण तलाव प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर सुपीक व बागायती जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्याऐवजी येलदरी धरणातून कालवा काढून सेनगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त व पाण्याची गरज असलेल्या भागाला सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे हा अधिक शाश्वत आणि शेतकरीहिताचा पर्याय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सेनगांव तालुक्यातील प्रस्तावित सुकळी साठवण तलाव प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा. येलदरी धरणातून कालवा काढून सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारे जमीन संपादन करू नये.प्रस्तावित प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या हरकती व म्हणणे अधिकृतरीत्या नोंदवावे. सुकळी साठवण तलाव प्रकल्पाचा संपूर्ण अहवाल, जमीन संपादनाचा प्रस्ताव, लाभक्षेत्र, खर्च व पर्यायी पाणीपुरवठ्याच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून प्रकल्पाची कार्यवाही पुढे नेऊ नये अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने व शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन सेनगाव तहसील कार्यालयासमोर तसेच मुंबई मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे तसेच पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Source link
सुकळी साठवण तलाव प्रकल्प तात्काळ रद्द करा:येलदरी धरणातून सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्या, अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन- क्रांतिकारी शेतकरी संघटना