![]()
स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेतून हिंगोली पालिकेने शहरातील 700 व्यापाऱ्यांना सोमवारी तारीख 11 डस्टबिनचे वाटप केले आहे. व्यापारी व हॉटेल चालकांनी इतरत्र कचरा न टाकता डस्टबिनमध्येच टाकावा असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले. या उपक्रमामुळे रस्त्यावर कचरा न टाकल्याने शहर स्वच्छतेत भर पडणार आहे. हिंगोली शहरामध्ये मागील काही दिवसात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. शहरातील सर्व प्रभागांमधून कचरा एकत्र केला जात असला तरी काही ठिकाणी मात्र व्यापारी व हॉटेल चालक रस्त्यालगतच कचरा फेकू लागले होते. त्यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काही दिवसापूर्वीच पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर नगराध्यक्ष रेखा श्रीराम बांगर यांनी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना कचरा साठविण्यासाठी डस्टबिन वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यातून व्यापारी व हॉटेल चालक ओला व सुका कचरा डस्टबिनमध्ये टाकतील त्यातून सार्वजनिक ठिकाणी कचरा मुक्त होतील असे स्पष्ट केले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांनाही स्वच्छतेचे उपक्रमात सहभागी करून घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षांच्या या निर्णयाला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यानुसार पालिका प्रशासनाने 700 डस्टबिन खरेदी केल्या. त्यानंतर आज आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते डस्टबिन वाटपाच्या उपक्रमाच्या उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शहरातील सर्व दुकानदारांना प्रत्येकी दोन डस्टबिनचे वाटप करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष माबूद बागवान, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगरसेवक सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, रामकिसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोटरे,स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. पालिकेच्या या निर्णयामुळे आता शहरातील दुकान व हॉटेलमधील ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच गोळा होणार असून त्यानंतर पालिकेकडून या कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक चौक कचरा मुक्त होण्यास मदत होणार आहे. व्यापाऱ्यांनी उपक्रमात सहभाग नोंदवावा – रेखा बांगर शहराची बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. शहर स्वच्छ राहिल्यास नागरीकांचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला स्वच्छ शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांनी केले आहे.
Source link
हिंगोली शहर स्वच्छतेसाठी पालिकेचे पाऊल:७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप, आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन