मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे महामंडळ वाटप अखेर निश्चित झाले आहे. या प्रकरणी महायुतीच्या घटकपक्षांत 48-29-23 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, हे वाटप महिन्याभरात होण्याची शक्यता आहे.
.
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी महांडळांच्या वाटपाकडे डोळे लावून बसले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन महामंडळ वाटपाचा तिढा सोडवला आहे. त्यांनी भाजप व मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे वाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या महिन्याभरात राज्यातील महामंडळांचे वाटप पूर्ण होईल. या प्रकरणी महायुतीचा फॉर्म्युलाही ठरला आहे. त्यानुसार, भाजपला सर्वाधिक 48 टक्के, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे 29 व 23 टक्के महामंडळे मिळतील.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री करणार शिक्कामोर्तब
महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. पण कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ मिळणार? हे अद्याप ठरले नाही. पुढील काही दिवसांत यावर महायुतीच्या घटकपक्षांत धीरगंभीर चर्चा होईल. त्यानंतर हा मुद्दाही निकाली निघेल. महायुतीच्या पुढील बैठकीत महामंडळातील सदस्य वाटप होईल. त्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महामंडळ वाटपाच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. तद्नंतर तिन्ही पक्षांचे नेते कोणत्या महामंडळावर कुणाची वर्णी लावायची याचा निर्णय घेतली. त्यासाठी अनेक नेते व पदाधिकारी आपापल्या परीने फिल्डिंग लावत आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील महिन्यात 17 जून रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्यास महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला अधिक गती येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांकडून आतापासूनच महामंडळांवर आपली वर्णी लावून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सत्ताधारी पक्षांमधील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…
वाल्मीक कराडची प्रकृती खालावली:मागील 3 दिवसांपासून सलाईनवर, वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याचा धोका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेल्या वाल्मीक कराडची तुरुंगात प्रकृती ढासळल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड कारागृहात मागील 3 दिवसांपासून सलाईनवर आहे. त्याला वेळीच योग्य उपचार मिळाले नाही, तर त्याचे यकृत निकामी होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला अंबाजोगाई स्थित स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या जात आहेत. वाचा सविस्तर