Headlines

माझे लग्न का लावून देत नाही?:मुलाने जाब विचारत आईला जिवंत जाळले, आरोपीला अटक; धुळ्यातील धक्कादायक घटना




ग्रामीण भागात तरुणांची लग्ने न जमण्याची समस्या किती भीषण स्वरूप धारण करत आहे, याचे एक सुन्न करणारे वास्तव धुळे तालुक्यातून समोर आले आहे. लग्न लावून देत नसल्याच्या संशयातून एका ४५ वर्षीय नराधम मुलाने आपल्या ६५ वर्षीय जन्मदात्या आईला अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. या भीषण घटनेत गंभीर भाजलेल्या जिजाबाई भटू खैरनार-पाटील यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील महिंदळे या ठिकाणी घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (वय ४५) याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी प्रदीप हा व्यवसायाने रिक्षाचालक आहे. त्याचे लग्न जमण्यात अडचणी येत होत्या. आपली आईच आपले लग्न लावून देत नाही, असा संशय प्रदीपच्या मनात घर करून होता. यावरून त्याच्या मनात आईविषयी तीव्र संताप आणि आकस निर्माण झाला होता. याच रागातून माय-लेकामध्ये वारंवार खटके उडत होते. अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून लावली आग शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जिजाबाई या मुलगा प्रदीप याची वाट पाहत घराच्या अंगणात बसल्या होत्या. प्रदीप मद्यधुंद अवस्थेत घरी आला. घरी येताच त्याने “माझे लग्न का लावून देत नाही?” असा जाब विचारत आईसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात प्रदीपने घरातील ज्वलनशील पदार्थ आणून थेट आई जिजाबाई यांच्या अंगावर ओतले आणि त्यांना पेटवून दिले. आगीच्या ज्वालांनी वेढलेल्या जिजाबाई यांनी आरडाओरड केली. जिजाबाई यांच्या किंकाळ्या ऐकून परिसरात खळबळ उडाली, मात्र तोपर्यंत त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या होत्या. पोलिसांकडून आरोपीला अटक घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गंभीर अवस्थेत जिजाबाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रदीप उर्फ दगडू खैरनार याला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. महिंदळे गावावर शोककळा आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला लग्ने न जमल्यामुळे तरुणांमधील वाढता मानसिक तणाव आणि दुसरीकडे मद्याचे व्यसन यातून अशा हिंसक घटना घडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महिंदळे ग्रामस्थांनी या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *