Headlines

मिरगव्हाण ते कोंढेज रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती:आपलं गाव आपली माणसंच्या पाठपुराव्याला यश‎




मिरगव्हाण ते कोंढेज (प्रजिमा) करमाळा मार्गावरील वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर ”आपलं गाव आपली माणसं” या सामाजिक संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून रखडलेल्या कामाला आता गती मिळाल्याचे दिसून येत आहे. मिरगव्हाण हा करमाळा तालुक्यातील शेवटचा भाग असून हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. हा परिसर ऊस उत्पादक पट्टा असल्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जाते. मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याने वाहने घसरत होती. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. गेल्या सहा महिन्यांपासून विविध स्तरावर प्रशासनाकडे तक्रारी करूनही काम सुरू होत नसल्याने संताप वाढत होता. महेश घरबुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराकडून कामात सतत दिरंगाई होत होती. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. अखेर पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयात जाऊन या प्रश्नाबाबत जोरदार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करमाळा विभागाशी तातडीने संपर्क साधून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अनामत रक्कम जप्त करणे व काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने दुरुस्तीचे काम सुरू केल्याचे सांगण्यात आले. या कारवाईनंतर रस्त्याच्या कामाला वेग आला असला तरी एवढ्या छोट्या दुरुस्तीच्या कामासाठी नागरिकांना सहा महिने पाठपुरावा करावा लागणे , ही बाब प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. सहा महिन्यापूर्वी निघाली वर्क ऑर्डर, पावसाळ्याच्या तोंडावर सुरूवात मिरगव्हाण ते कोंढेज हा सुमारे ३० किमी रस्त्याची दोन वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याच्या वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम मंजूर झाल्यावर दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी या कामाची वर्क ऑर्डर निघाली होती. मात्र तब्बल सहा महिन्यांच्या विलंबानंतर हे काम आता सुरू झाल्याने पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. घाईगडबडीत होणाऱ्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या रस्त्याच्या निधी व कामाच्या तपशीलाविषयी माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळाचे उपअभियंता यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. प्रशासनाने दखल घेतली, रस्त्याचे काम दर्जदार व्हावे ही अपेक्षा गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही ‘आपलं गाव आपली माणसं’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतली. आता हा रस्ता दर्जेदार पद्धतीने आणि लवकर पूर्ण व्हावा, हीच अपेक्षा आहे. पावसाळ्या सुरू होण्यापूर्वी काम झाले पाहिजे. महेश घरबुडे, अध्यक्ष व संस्थापक, आपलं गाव आपली माणसं सामाजिक संस्था. अर्जुननगर रस्त्याचे भूमिपूजन झाले, पण कामाचा पत्ता नाही! मिरगव्हाण ते कोंढेज मार्गावरील मिरगव्हाण ते अर्जुननगर दरम्यानच्या दोन किलोमीटर रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कामासाठी तब्बल २ कोटी ३ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. मात्र भूमिपूजनाला अनेक महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. दोन वर्ष होत आली तरी काम होत नाही. खड्ड्यातून मार्गक्रमण करावा लागत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *