![]()
कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वारा झाला. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील अनेक गावांत घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक गरिबांचे संसारोपयोगी साहित्य उघड्यावर पडले असून, काढणीला आलेल्या फळबागा आणि साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला तातडीने आणि सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सायंकाळी वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विजेचे खांब वाकले आणि वीज वाहिन्या तुटल्याने ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे डाळिंब बागांसह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी साठवणुकीसाठी ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या कांद्यावरील आच्छादने हवेत उडून गेल्याने कांदा भिजला असून, उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळाने मोठे नुकसान केले. त्यात खिर्डीगणेश येथे शब्बीर सांडू शेख यांच्या पोल्ट्रीचे शेड कोसळले. मढी बुद्रुकला सुनील बाबासाहेब चव्हाण यांच्या घरावरील पत्रे उडाले व भिंती पडल्या. बहादरपूरात काही झाडे व फांद्या तुटल्या, दोन कच्च्या घरांचे पत्रे उडाले. तळेगावमळेत मंदा मंजहारी वैद्य यांच्या घरावर आणि कांदा चाळीवर मोठे झाड कोसळले. वेस: भगवान नाना माळी यांच्या घराचे पत्रे उडून घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहणार नाही “बाधित शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. तसेच, मतदारसंघातील एकही बाधित शेतकरी किंवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. पंचनामे करताना कोणताही दुजाभाव किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे.
Source link
वादळी पावसामुळे घरांची पडझड, कांदा अन् फळबागांचे मोठे नुकसान:झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, आ. काळेंच्या प्रशासनाला सूचना