![]()
आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत धर्माच्या स्वतंत्र ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “हिंदू हा धर्म नसून भारतात त्याला अधिकृत मान्यता नाही, त्यामुळे जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात लिंगायत बांधवांनी केवळ ‘लिंगायत’ असेच नमूद करावे,” असे खळबळजनक आवाहन बंगळूर धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामीजी यांनी केले आहे. मात्र, त्यांच्या या भूमीकेला नाशिकच्या श्रीकाळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महंत यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, स्वामीजींनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. जनबसवनंद स्वामी यांनी म्हटले की, भारतात सध्या अधिकृतपणे जैन, बौद्ध आणि शीख या तीनच भारतीय वंशाच्या धर्मांना मान्यता आहे. ब्रिटिश राजवटीत लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक मान्यता होती, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही मान्यता मोडीत निघाली. त्यामुळे लिंगायत धर्माला सार्वजनिक आणि कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी आगामी जनगणनेचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन केले जाणार असून, येत्या २ जून २०२६ पासून सोलापूरच्या मंगळवेढा येथून थेट मुंबईपर्यंत भव्य ‘लिंगायत धर्म जनजागृती यात्रा’ काढण्यात येणार असल्याचे जनबसवनंद स्वामी यांनी जाहीर केले. हिंदू ही सांस्कृतिक ओळख; सुधीरदास महंतांचे प्रत्युत्तर जनबसवनंद स्वामींच्या या विधानावर श्रीकाळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महंत यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, हिंदू असणे हा केवळ धर्म नसून ती एक राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळख आहे. “सनातन वैदिक संस्कृतीसह बौद्ध, जैन आणि शीख हे सर्व याच व्यापक व्याख्येत सामावतात. ज्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी ही भारत आहे, ते सर्वच हिंदू आहेत,” असे त्यांनी सांगितले. धार्मिक विभाजनाचा धोका सुधीरदास महंत यांनी पुढे म्हटले की, लिंगायत समाज हा हिंदू धर्म आणि सनातनी विचारानेच पूजा-अर्चा करतो. अशा प्रकारे प्रत्येक संप्रदायाने स्वतंत्र धर्माची मागणी केल्यास भारताचे धार्मिक ऐक्य धोक्यात येईल आणि समाजात दुफळी निर्माण होईल. जनबसवनंद स्वामीजींनी हिंदू धर्माची व्याख्या नीट समजून घेऊन आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
Source link
हिंदू धर्म नाही, लिंगायत बांधवांनी जनगणनेत केवळ 'लिंगायत' नोंदवा:बसवनंद स्वामीजींचे विधान, काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांचा आक्षेप