![]()
तथाकथित सत्संग व आध्यात्मिकतेच्या माध्यमातून केलेली काही कर्मे ही अंधश्रद्धेला कारणीभूत होतात. याचे फलित काहीच होत नाही. अंधश्रद्धा ही काही केल्या जात नाही. त्यामुळे बेगडी माणसांच्या आहारी न जाता सरळ भगवंताची कास धरा; कारण भगवंतामुळे तुम्हाला खरा मार्ग मिळेल व त्यांचा अनुग्रह आपणावर खऱ्या अर्थाने होऊ शकेल, असे वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज म्हणाले. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञात मार्गदर्शन करत होते. माहेश्वरी भवनात रोज सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञात राजेशकृष्ण महाराजांनी भागवत कथेचे द्वितीय पुष्प सादर केले. जीवनात येणारे सुख- दु:ख हे आपल्या कर्माच्या परिपाकाने आपणास प्राप्त होते. हे सुख व दुख प्रत्येक जीवाला भोगावेच लागते. त्यात बदल कोणालाही करणे शक्य नाही. अगदी संतही आपले प्रारब्ध बदलू शकत नाहीत. जग नियंत्याची अशी रचनाच या संदर्भात असून जीवनात दुःखे येतात त्याला दूर करण्याचे कोणतेही साधन अस्तित्वात नाही.तथापी संतांच्या माध्यमातून ते कमी होऊ शकते, मात्र समाप्त होऊ शकत नाही. नशिबाचे प्रारब्ध हे भोगावेच लागते. यात उत्तम मार्ग म्हणजे चांगले कर्म करून भगवंत प्राप्ती हा एकमेव उपाय व इलाज आहे. सत्संगाने येणारी दुखे ही कष्टनाशक होतात. त्यामुळे सुखी जीवनासाठी उत्तम कर्म व सत्संगाची कास धरणे आवश्यक असल्याचा हितोपदेश राजेशकृष्ण महाराज यांनी केला. कथेत त्यांनी गायलेल्या सुंदर भजनानी संपूर्ण परिसर दणाणून गेला. सर्वप्रथम कथेचे मुख्य अजमान उमेश तावरे, मीना टावरी, किशोर लाहोटी, कृष्णा लाहोटी, रमेश मालपाणी, शिवलीला मालपाणी, कुंजबिहारी जाजू, अनुसया जाजू व आरती यजमान उषा भुतडा, कांता भट्टड, शारदा लखोटिया, स्मिता भट्टड, संगीता राठी व चंदना लटुरिया यांच्या उपस्थितीत आरतीने प्रारंभ करण्यात आला. या कथा उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, आरती जाजू, सहसचिव सुनीता हेडा, राधा टावरी, कोषाध्यक्ष अनिता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक समवेत महिला मंडळाच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले. राजेशकृष्ण महाराज यांनी भागवत महिमा विषद केली. भागवत हे अमृताचे फळ आहे. या फळाला साल व बी नाही. हे कथारूपी अमृत जो प्राशन करेल त्याला शाश्वत सुखाची प्राप्ती हमखास होणार. भागवताची कथा वारंवार श्रवण करा, जेणेकरून ही कथा नित्य नव्या नव्या प्रेरणा घेऊन आपणास नवे मार्ग दाखवू शकेल. या सत्रात त्यांनी भागवतामधील हे शरीर आपणास का मिळाले, शास्त्राचे सार काय आहे, कोणत्या देवाला पूजल्याने सर्व देव प्रसन्न होतात, भगवंताचा अवतार कशासाठी होतो, भगवंताचे किती अवतार आहेत. धर्म स्थापनेसाठी धर्म कोणाला शरण जा म्हणतो आदींची व्याख्या विशद केली. ईर्षा ठरते मनुष्याच्या पतनास कारणीभूत कलियुगाचे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे पाच मित्र आहेत. यात मत्सर हा भयानक स्वरूपाचा आहे. ही ईर्षा मनुष्याच्या पतनास कारणीभूत ठरत असून प्रभुप्रातीच्या मार्गात ही ईर्षा समाप्त करणे गरजेचे असल्याचे राजेशकृष्ण महाराज यांनी सांगितले. यासाठी मनाला भगवंताची जोडा. ज्याने मन नियंत्रित केले, प्रभूप्राप्तीकडे नेले तो खरा भक्त असल्याचे राजेशकृष्ण महाराज यांनी सांगितले.
Source link
बेगडी माणसांच्या आहारी न जाता भगवंताची कास धरा:भागवत कथेत राजेशकृष्ण महाराजांचे प्रतिपादन