![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते तथा मंत्री आज चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित होते. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच चोंडीचा विकास आराखडा मंजूर झाला असून आचारसंहिता असल्याने काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले नसल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासने दिली आहेत, ती तुमच्या समोर आहेत. कुठेही मागे आश्वासन दिले नाही. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी ते वाचून दाखवले आहे. त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच आमच्या शासनाची राहिलेली आहे. त्यानुसारच कारवाई केलेली आहे. दरम्यान, चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी तिथे उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या देशात ज्यांनी हिंदू अस्मिता जागृत ठेवली. ज्यांनी अनेक आक्रमानांनंतर सनातन धर्म जीवंत ठेवला, ज्यांनी लोकशासन आणि लोकप्रशासन कसे असू शकते याचे आदर्श उदाहरण छत्रपती शिवरायांच्यानंतर दिले अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो होतो. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील वर्षी आपण त्यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली, महाराष्ट्रातील जेवढी शक्तिस्थळ आहेत त्यांचे पुनर्निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केला. आणि जे निर्णय घेतले ते सर्व कामे आम्ही सुरू केली आहेत. इथला देखील विकास आराखडा हा मंजूर झालेला आहे. प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वात याचे सर्व काही गोष्टी पूर्ण केल्या आहेत. मात्र आचारसंहिता सुरू असल्याने त्याचे भूमिपूजन करता आले नाही, आचारसंहिता झाल्यानंतर भूमिपूजन करू, असे आश्वासन दिले आहे. चोंडीत विरोधकांचे अत्यंत किळसवाणे वर्तन बघायला मिळाले- रोहित पवार दरम्यान, चोंडी येथे अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील काल रात्री उपस्थिती लावली होती. मात्र तिथे घडलेल्या प्रकारावर पवारांनी ट्विट करत टीका केली आहे. ते म्हणाले, लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी रात्री अभिवादन करण्यासाठी गेलो असता विरोधकांचे अत्यंत किळसवाणे आणि शरम वाटावी असे वर्तन बघायला मिळाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेण्याऐवजी त्यांच्या जयंतीच्या नावाने स्वतःचाच उदोउदो करुन घेण्याची हौस भागवली जात होती, अशी टीका त्यांनी केली आहे. पुढे रोहित पवार म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विराट कर्तृत्त्वाचे, उत्तुंग नेतृत्त्वाचे, समाजाप्रतीच्या निष्ठेचे गोडवे गाण्याऐवजी ‘रामभाऊ तुमचे काम एक नंबर’ अशी स्वतःचीच आरती गाणारी ओंगाळवाणी गाणी ऐकावी लागत होती… हे ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे की विरोधकांच्या वाढदिवसाची पार्टी आहे, असा प्रश्न पडला. तिथेच मिरवणुकीसारखे वातावरण दिसले.. वाटले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक असावी, पण ती मिरवणूक नव्हती तर दुसऱ्या एका आमदाराला काहीजण खांद्यावर घेऊन आत्मस्तुती करणाऱ्या ‘नाद करायचा नाय’ गाण्यावर नाचत होते. विशेष म्हणजे हे सगळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाजवळ घडत होते आणि यावरही कळस म्हणजे या स्थळाचे पावित्र भंग करणारी शिविगाळही इथे ऐकायला मिळाली.. हे सगळे संतापजनक आहे. किमान कुठे कसे वागायचे याचे तरी भान लोकप्रतिनिधींनी ठेवले पाहिजे, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
Source link
मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका:CM देवेंद्र फडणवीसांचे विधान, म्हणाले- दिलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम