![]()
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांनी लोंढे यांच्या विजयाचा दावा करताना, भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. डॉ. नितीन राऊत यांनी निवडणुकीतील राजकीय गणितांवर बोलताना म्हटले की, “निवडणुकीची अंतर्गत बेरीज-वजाबाकी पूर्ण झाली आहे.” हा विषय सार्वजनिकपणे सांगण्याचा नसला तरी, मतदानानंतर भाजपचे किती नगरसेवक फोडले हे सर्वांच्या लक्षात येईल, असा दावा त्यांनी केला. आमदार विकास ठाकरे यांनीही राऊत यांच्या दाव्याला दुजोरा दिला. त्यांच्या मते, भाजपकडे कागदावर बहुमत असले तरी, अतुल लोंढे १०० हून अधिक मतांनी निवडून येतील. गुप्त मतदान पद्धतीमुळे भाजपची मते फोडण्याची तयारी लोंढे यांनी स्वतः केली आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. लोंढे हे योग्य उमेदवार, उत्तम प्रवक्ते आणि बहुजन समाजातील मोठा चेहरा असल्याचे काँग्रेस नेत्यांनी नमूद केले. काँग्रेसने विचारपूर्वक त्यांना रिंगणात उतरवले असून, त्यांच्या विजयाची पूर्ण संधी असल्याचे म्हटले आहे. डॉ. नितीन राऊत यांच्यासारखे अनुभवी नेते या निवडणुकीची धुरा सांभाळत असल्याने ही जागा काँग्रेस जिंकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, डॉ. राऊत यांनी विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेवरही भाष्य केले. काँग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, परंतु सध्याच्या भाजप प्रणित सरकारची तशी मानसिकता दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. हे सरकार केवळ घोषणाबाजी करत असून, लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास हिरावून घेणारे असल्याचे राऊत म्हणाले.
Source link
विधान परिषदेत घोडेबाजार होणार:डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत