Headlines

हिंगोलीत वखार महामंडळाचा निष्काळजीपणा:पहिल्याच पावसात 40 हजार क्विंटल हरभरा भिजला!




हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सदोष गोदामा भाडेतत्वावर घेतल्याने पहिल्याच पावसाच गोदामातील ४० हजार क्विंटल हरभरा भिजल्याने नुकसान झाले. आता हरभरा पिकाचा साठा कलगाव (ता.हिंगोली) गोदामात हलविण्याचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक व हमालीचा लाखो रुपयांच्या भुर्दंड शासनाच्या माथी बसणार आहे. वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा हा परिमाण असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामात नाफेडमार्फत खरेदी केलेला हरभरा ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे गोदाम भाडेतत्वावर घेतांना कोणतेही निकष पाळण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्याच वादळी वाऱ्यासह पावसामध्ये गोदामाचे टीनपत्रे उडून गेली तर लोखंडी अँगल देखील वाकले. त्यामुळे गोदामात ठेवलेला सुमारे ४० हजार क्विंटल हरभरा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या संदर्भात वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गोदामातील भिजलेल्या हरभऱ्यामुळे शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान झाले नसल्याने कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये असे आवाहन केले. मात्र गोदाम सदोष होते काय हे सांगण्यास मात्र महामंडळाच्या अधिकारी धजावत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आता औद्योगिक वसाहतीमधील गोदामातील हरभरा पिकाचा साठा कलगाव (ता. हिंगोली) येथे नव्याने भाडेतत्वार घेतलेल्या गोदामात हलविण्याचे काम सुरु आहे. यामुळे आता हमाली तसेच वाहतूकीचा लाखो रुपयांचा भुर्दंड शासनाच्या माथी बसणार आहे. त्यामुळे आता हमाली व वाहतूकीचा खर्च गोदाम भाडेतत्वावर घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. शासनाचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न- सचिन जाधव, व्यवस्थापक वखार महामंडळ या परिसरात वादळी वारे अन पाऊस झाल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी सध्या या गोदामातून हरभरा साठा हलविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. सध्याच्या स्थितीत १० ते १५ टक्केच साठा हलविता आला आहे. साठा हलविल्यानंतरच पुढील बाबी स्पष्ट होतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *