Headlines

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही:केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही; चर्चांना आणि अफवांना अखेर पूर्णविराम




ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या विभागाला टाळे लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच यावर स्पष्टीकरण दिल्याने वृत्त विभाग बंद होण्याच्या सर्व अफवा आणि चर्चांना कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होण्याच्या शक्यतेमुळे श्रोत्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या विषयात तातडीने लक्ष घातले. त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुण्याच्या दृष्टीने या वृत्त विभागाचे असलेले ऐतिहासिक महत्त्व त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि कोणत्याही परिस्थितीत हा विभाग कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली. रेल्वे विभागाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि नव्या रेल्वे सेवांच्या लोकार्पणासाठी अश्विनी वैष्णव नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले आणि याच वेळी त्यांच्यात या प्रश्नावर महत्त्वाची चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार केंद्र सरकारसमोर नसल्याचे अश्विनी वैष्णव यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले, ज्यामुळे पुणेकरांना आणि आकाशवाणीच्या श्रोत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वृत्त विभाग बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही- अश्विनी वैष्णव अश्विनी वैष्णव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील आकाशवाणी केंद्रांचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्याचे काम सुरू आहे. आकाशवाणी अधिक प्रभावी, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही विविध स्तरांवर प्रयत्न करत आहोत. त्यामुळे पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट स्थानिक बातम्या आणि जनसंपर्क अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व आकाशवाणी केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम- मुरलीधर मोहोळ यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे आकाशवाणी केंद्राला गौरवशाली इतिहास लाभला आहे. आजही जवळपास सव्वा कोटी श्रोते नियमितपणे आकाशवाणीवरील बातम्यांवर विश्वास ठेवतात. प्रत्येक श्रोत्याच्या मनातील भावना आणि अपेक्षा मी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहील, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यामुळे वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळायला हवा. आकाशवाणीचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकार घेत असलेल्या पुढाकाराबद्दल मी मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पुणे आकाशवाणी ही केवळ एक साधी प्रसारण संस्था नसून, तो पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या वैभवशाली इतिहासाचा एक अविभाज्य घटक आहे. याच पार्श्वभूमीवर, या ऐतिहासिक वारशाचे केवळ जतन आणि संवर्धनच न करता, योग्य ते आधुनिकीकरण करून तो अधिक सक्षम व प्रभावी स्वरूपात पुढे नेण्याचा केंद्र सरकारचा ठाम निर्धार असल्याचे या महत्त्वपूर्ण भेटीतून स्पष्ट झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *