.

तत्कालीन समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील मक्तेदारीविरुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या समाजाला सर्वाधिक गरज आहे. महात्मा फुलेंनी त्या काळात समाज परिवर्तनासाठी जे कार्य केले, ते अत्यंत क्रांतिकारी होते, अशा शब्दांत मनोगत व्यक्त करत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विविध संस्था, सामाजिक संघनटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.
महात्मा फुले यांच्या विचारांमुळे समाज जागृती : फुलसौंदर
महात्मा फुले यांच्या कार्यामुळे समाजात समतेची जाणीव निर्माण झाली आणि शिक्षणाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचले. त्या काळात समाजात जागृती घडवून आणत अनेकांना ज्ञानदान केले. त्यांच्या विचारांमुळे एक सशक्त आणि जागृत समाज निर्माण झाला, असे प्रतिपादन भिंगार अर्बन बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर यांनी केले. भिंगार अर्बन बँकेतर्फे माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानतर्फे अभिवादन
महात्मा फुले यांनी समाजातील अन्याय, अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आणि समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाचा स्वीकार करून प्रगतीचा मार्ग धरावा, असे आवाहन केले. समाजात समानता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या विचारांचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. युवकांनी फुले यांच्या आदर्शांचा अंगीकार करून समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले. ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरतर्फे माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महात्मा फुले यांचे विचार दिशादर्शक : आ. जगताप
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आपल्या लेखणीतून मांडून समाजजागृती केली.त्यांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून समाजाला योग्य दिशा देणारे आहेत असे प्रतिपादन शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
समता, बंधुता अन् शिक्षणाचा संदेश प्रत्येकाला देण्याची गरज : प्रा. होले नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री संत सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थांच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा फुलेंनी दिलेला समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे असे प्रा. एकनाथ होले यांनी सांगितले.