![]()
पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दुसरीकडे, विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात आहेत. तत्पूर्वी, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. फडणवीस म्हणाले, तीन आठवड्यांचे पूर्ण अधिवेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत या दृष्टीने सकारात्मक चर्चा आणि त्यावर सरकारच्या वतीने योग्य उपाययोजना अशा पद्धतीचे नियोजन करणे हे सरकारी पक्ष म्हणून आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत. आजही आमच्या विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार टाकला. ते आले असते तर चर्चा झाली असती. पण त्याऐवजी त्यांनी आम्हाला ६ पानांचे पत्र दिले आहे. हे पत्र एआयच्या मदतीने तयार केले आहे. विरोधकांकडे पत्र तयार करण्यासाठीही आता विषय राहिले नाहीत, कल्पकता राहिली नाही, असा टोला त्यांनी या वेळी लगावला. खासगी कौशल्य विद्यापीठांसह इतर महत्त्वाची विधेयके मांडणार महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग (सुधारणा) विधेयक, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विधेयक, • महाराष्ट्र खासगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक,• महाराष्ट्र वस्तू व सेवा (सुधारणा) विधेयक, २०२६ (वित्त विभाग) यासह महत्त्वाची विधेयके अधिवेशनात मांडण्यात येतील. विरोधकांचा राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार विरोधकांनी सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत १३ गंभीर प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी पायऱ्यांवर बसून स्टंटबाजी करण्याऐवजी सभागृहात येऊन चर्चा करावी, असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
Source link
आजपासून पावसाळी अधिवेशन:विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन