![]()
सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार असल्याचेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच भोंदू अशोक खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही तर ठरवून आणले गेले असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले, भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही तर ठरवून आणले गेले असून ही फक्त सुरुवात असल्याचे पवार म्हणाले. पुढे रोहित पवार म्हणाले, आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणेच उचित राहील, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हे वृत्त खुद्द एकनाथ शिंदे यांनीच फेटाळून लावले होते. अशी कोणतीही बैठक झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. काय म्हणाले होते एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे म्हणाले होते की, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. उबाठाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही. अशी कोणतीही बैठक झाली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
Source link
सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार:खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही, ते आणले गेले; रोहित पवारांचा मोठा दावा