![]()
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांड प्रकरणाचे गुरुवारी विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणि प्रशासकीय ढिसाळपणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत “संवेदनशून्य सरकार’ अशी घणाघाती टीका केली. तर, विरोधक या संवेदनशील विषयावर केवळ राजकारण करत असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. दोन्ही बाजूंचे सदस्य आक्रमक झाल्याने सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपींवर “मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा विचार सुरू असून, सर्व २२ मृतांच्या कुटुंबीयांना पुढील ७ दिवसांत आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. भाजप आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली. यावर चर्चेदरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आमदार सचिन अहिर, अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. “हडपसर, दापोडी, बोपोडी परिसरात वर्षानुवर्षे अवैध दारूचे अड्डे सुरू आहेत. या कांडातील काही मृतांवर पोस्टमॉर्टेमशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यामुळे प्रत्यक्ष मृतांचा आकडा अधिक असू शकतो,” असा दावा विरोधकांनी केला. तसेच भिवंडीतून २१५ लिटर मिथेनॉल पुण्यात आलेच कसे, असा सवाल करत वरिष्ठ पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन नव्हे तर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री भेटायलाही गेले नाहीत : सचिन अहिर चर्चेदरम्यान आमदार सचिन अहिर यांनी टोला लगावला की, “एवढी मोठी घटना घडूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनी अजूनही पीडित कुटुंबांची भेट घेतलेली नाही. हे सरकार गंभीर नाही. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सीआयडी चौकशीचे आदेश दिले असून मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. मात्र, विरोधकांचे समाधान झाले नाही आणि गोंधळ सुरू झाला.
Source link
पुणे दारूकांड:मुख्य आरोपींवर "मकोका’ लावणार- मंत्री कदम, वारसांना आठवड्यात आर्थिक मदत