Headlines

सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना टोला:एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही; कंत्राटदारांच्या अधिवेशनाची क्लिपही पाठवणार




कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांच्या असमतोलावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जिल्हा नियोजन समितीचा (डीपीडीसी) निधी केवळ सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात खर्च केला जात असून विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “एका तालुक्याचा विकास झाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला, असे होत नाही,” असा खोचक टोला त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला. ‘ती’ व्हिडिओ क्लिप स्वतः मुश्रीफांना पाठवणार काही दिवसांपूर्वी झालेल्या शासकीय ठेकेदारांच्या अधिवेशनाचा संदर्भ देत सतेज पाटील यांनी मोठे वक्तव्य केले. “त्या अधिवेशनाची व्हिडिओ क्लिप मी स्वतः हसन मुश्रीफ यांना पाठवणार आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची बिकट अवस्था, सर्वत्र पडलेले खड्डे आणि ठेकेदारांची थकीत बिले याचे वास्तव त्यातून स्पष्ट दिसेल,” असे ते म्हणाले. सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात विकासकामांची गुणवत्ता आणि ठेकेदारांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही त्यांनी केली. डीपीडीसी निधी वाटपावर सरकारला घेरलं सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या वाटपावरही नाराजी व्यक्त केली. सध्या डीपीडीसीचा निधी केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात खर्च होत असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधी पक्षांच्या मतदारसंघांवर अन्याय होत असल्याचे म्हटले. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत सरकारने त्यांच्या समतेच्या आणि लोककल्याणाच्या विचारांनुसार कारभार करावा, असे आवाहन केले. शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीची मागणी राज्यात पावसाला झालेल्या उशिरामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे सांगत सतेज पाटील यांनी सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी केली. यासोबतच राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठीही सरकारने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी म्हटले. गोकुळ निवडणुकीतील गोंधळावरही सवाल गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठराव दाखल करताना झालेल्या गोंधळावरही सतेज पाटील यांनी टीका केली. त्यांच्या मते, प्रत्येक ठरावधारकाने स्वतंत्रपणे ठराव दाखल करणे अपेक्षित होते. मात्र शक्तिप्रदर्शनासाठी एकाच वेळी मोठी गर्दी करण्यात आल्याने प्रशासनावर अनावश्यक दबाव निर्माण झाला. “ठराव दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. दररोज शंभर ठराव दाखल झाले तरी प्रशासन त्यांची नोंद करू शकते. मात्र एका दिवसात झालेल्या गर्दीमुळे नेमका ठराव कोणी दाखल केला, त्यावर कोणाची सही आहे, याची खातरजमा करणे कठीण झाले,” असे ते म्हणाले. दुबार ठरावांमुळे प्रकरण पुन्हा न्यायालयात? सतेज पाटील यांनी दावा केला की, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या नमुन्याचाच वापर करून अनेक ठिकाणी पुन्हा ठराव दाखल केले जात आहेत. यामुळे सुमारे 150 ते 200 दुबार ठराव येण्याची शक्यता असून हे संपूर्ण प्रकरण पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. “प्रशासनावर दबाव आणून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यापेक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. ‘शक्तिfपीठ महामार्ग’ जनभावनेविरोधात जिल्हा परिषदेत शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंजूर झालेल्या ठरावाचे स्वागत करत सतेज पाटील यांनी हा प्रकल्प जनभावनेविरोधात असल्याचा दावा केला. “आम्ही विकासाला विरोध करत नाही. पण या महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांची सुपीक जमीन जाणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करून कोणताही विकास स्वीकारता येणार नाही. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करावा,” अशी मागणी त्यांनी केली. ‘मविआचे आमदार कुठेही जाणार नाहीत’ महाविकास आघाडीच्या बैठकीला काही आमदार गैरहजर राहिल्यामुळे सुरू झालेल्या चर्चांनाही सतेज पाटील यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “बैठकीची तारीख अचानक बदलल्यामुळे काही आमदारांना उपस्थित राहता आले नाही. त्यांनी त्यामागची योग्य कारणे दिली आहेत. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे.” तसेच ठाकरे गटातील आमदार फुटणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “ज्यांना जायचे होते ते 2022 मध्येच गेले. आता महाविकास आघाडीचे आमदार कुठेही जाणार नाहीत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *