उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यानंतर आणि पक्षांतरावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झालेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्रिपदाबाबत मोठी घोषणा करत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न
.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. परभणीनंतर धाराशिवमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली होती. या सभेनंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले.
‘सत्तेसमोर शहाणपण चालत नाही’
पक्षांतराबाबत बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “सत्तेसमोर शहाणपण चालत नसल्याने आम्ही आता शहाणपण बाजूला ठेवून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.” मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.
‘मंत्रिपदासाठी नाही, मतदारसंघासाठी निर्णय’
गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर यांच्या केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र या सर्व चर्चांवर त्यांनी स्वतःच भूमिका स्पष्ट केली. “अनेक जण म्हणत आहेत की मी मंत्रिपदासाठी आणि स्वार्थासाठी पक्ष बदलला. पण मी आज स्पष्ट सांगू इच्छितो की, मी मंत्रिपद स्वीकारणार नाही. समोरून ऑफर आली तरी ती नाकारेन. माझ्या वैयक्तिक पदासाठी हा निर्णय घेतलेला नाही. माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. माझ्या कामातूनच टीका करणाऱ्यांना उत्तर देईन,” असे त्यांनी सांगितले.
ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत, पण आता शिंदेंसोबत
ओमराजे निंबाळकर हे आतापर्यंत ठाकरे कुटुंबाचे कट्टर निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवली होती. त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदार-खासदारांवर जोरदार टीका करत ‘निष्ठेपेक्षा मोठं काही नाही’ अशी भूमिका घेतली होती.
मात्र, यावेळी त्यांनी स्वतःच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे समर्थकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर पैशासाठी आणि मंत्रिपदाच्या आशेने पक्षांतर केल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर उत्तर देताना त्यांनी मंत्रिपद नाकारण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विस्तारात महाराष्ट्रातून काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर आणि संजय (बंडू) जाधव यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःच मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे जाहीर केल्याने आता शिवसेनेकडून अखेर कोणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातमी वाचा…
तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार?:हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला, उद्धव ठाकरेंचा निंबाळकरांवर हल्लाबोल

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट या 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे सुरू करून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. याच दौऱ्याचा भाग म्हणून आज धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली, ज्यामध्ये संजय राऊत यांनी सर्वप्रथम ओमराजेंवर सडकून टीका करत जोरदार हल्लाबोल केला.
गद्दाराच्या सभेला मी आलो होतो..
उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे फिरत नाही म्हणतात उद्धव ठाकरे फिरायला लागले की काय होत ते महाराष्ट्र बघतोय. या सभा नाही, या माझ्या कौटुंबिक बैठका आहेत, यांनी कितीही आमदार फोडू दे, तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय मी राहणार नाही. लोकसभा निवडणुकांवेळी, समोरच्यांकडून पैशांचा पाऊस पडत होता, तेव्हा या गद्दारासाठी एका शेतकऱ्याने त्याच्याकडचे पैसे निवडणुकीसाठी दिले. गद्दाराच्या सभेला मी आलो होतो तेंव्हा एक गरीब शेतकरी आला आणि म्हणाला, मला खासदारला पैसे द्यायचे आहेत. काय भाषण काय देत होता… माझा फोन नंबर घ्या म्हणायचा, मी फोन करायला लागलो तर फोन उचलायचा नाही. मग, मी कैलासला म्हणालो अरे हा तर फोन उचलत नाही, असे म्हणत ओमराजे निंबाळकरांवर ठाकरेंनी निशाणा साधला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
मोदी मंत्रिमंडळातून हे 6 मंत्री बाहेर पडू शकतात:श्रीकांत शिंदेंसह 9 नवीन चेहऱ्यांच्या समावेशाची चर्चा; मोठ्या फेरबदलामागची कहाणी

धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना मोदी मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मंत्रालय बदलले जाण्याची आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना नवे अर्थमंत्री बनवले जाण्याची चर्चा आहे. सूत्रांनुसार, मोदी मंत्रिमंडळात हा मोठा फेरबदल पुढील काही आठवड्यांत होऊ शकतो. येथे वाचा संपूर्ण बातमी