![]()
महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना होणे गरजेचे आहे, असे मत मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित पहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आवलगावकर म्हणाले की, महाराष्ट्रात शेकडो लोककला आणि हजारो लोककलावंत आहेत, जे अनेक वर्षांपासून राज्याची लोककला संस्कृती आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेत आहेत. लोककला ही केवळ एक कला नसून ती महाराष्ट्राची ओळख आहे. या लोककलांचा शास्त्रीय दृष्ट्या सखोल अभ्यास होण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग आणि समरसता साहित्य परिषदेतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसन्न पाटील, धनंजय खुडे, निलेश गद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. अविनाश आवलगावकर यांनी पुढे सांगितले की, लोककला आणि ते सादर करणारे लोककलावंत हा महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे. मात्र, दुर्दैवाने हजारो लोककलावंतांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. या कलावंतांना लोकाश्रयासोबतच राजाश्रयाचीही खरी गरज आहे. समरसता लोककला संमेलनासारखी अधिवेशने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताच्या विविध भागांमध्ये दरवर्षी आयोजित करणे आवश्यक आहे. यामुळे देशाच्या विविध भागांतील लोककलावंतांना व्यासपीठ मिळेल आणि त्यांची कला जगासमोर येऊ शकेल. शासनाकडून लोककलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वप्रथम लोककलावंतांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यांनी एकमुखाने मागणी केल्यास हे शक्य होईल. लोककला हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा असून, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी या कलांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषा विद्यापीठाप्रमाणेच लोककलांच्या स्वतंत्र अभ्यासासाठी वेगळ्या लोककला विद्यापीठांची आवश्यकता असल्याचेही आवलगावकर यांनी नमूद केले. समारोपापूर्वी झालेल्या कवी संमेलनात अशोक गुट्टे, चंद्रकांत गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, प्राध्यापक वा. ना. आंधळे, रानकवी तुकाराम धांडे आणि कुमार चव्हाण या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
Source link
महाराष्ट्रात स्वतंत्र लोककला विद्यापीठाची गरज:मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवलगावकर यांचे मत