Headlines

अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासांत 5.13% वाढ:मध्य प्रदेश सीमेवरील पावसामुळे 28.70 दलघमीने वाढला जलसाठा




अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात गेल्या ४८ तासांत ५.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हा जलसाठा २७.७० दशलक्ष घनमीटरने (दलघमी) वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी धरणाचा जलसाठा २५७.७१ दलघमी (४५.६० टक्के) होता. आता तो २८६.१५ दलघमीवर पोहोचला आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, केवळ दोन दिवसांत ५.१३ टक्क्यांनी वाढ होण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे. या धरणात येणारे बहुतेक पाणी मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातून येते, ज्यात वरुड नजिकच्या जलालखेडा, साहूर, भारसिंगी, नारा येथील नद्यांचा समावेश आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापासून या भागात चांगला पाऊस होत असल्याने नद्यांद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा झाले आहे. धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता, जलसंपदा विभाग पाणी पातळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगामी काळात पाऊस असाच सुरू राहिल्यास धरणाचे दरवाजे केव्हाही उघडावे लागण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे, वर्धा नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अप्पर वर्धा धरण हे अमरावती-बडनेरा शहरासह जिल्ह्यातील अनेक शहरांच्या आणि ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत आहे. या धरणावर हजारो हेक्टर शेतीची सिंचन व्यवस्था देखील अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे निर्माण झालेली चिंता या वाढीव जलसाठ्यामुळे कमी झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *