![]()
जिल्हा व शहर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची पाक्षिक सभा राधानगर येथील गुरुदेव सेवाश्रमात उत्साहात पार पडली. या सभेत अंधश्रद्धाविरोधी मोहिम अधिक व्यापक करण्यासह नवीन शाखा स्थापन करुन संघटन विस्ताराला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल
.
सभेच्या प्रारंभी विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठकीतील निर्णय, विविध शाखांचे अहवाल आणि आगामी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा व शहर शाखेने राबविलेल्या सामाजिक, प्रबोधनात्मक आणि जनजागृती उपक्रमांवर चर्चा करून पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाशी समन्वय वाढविणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे तसेच विवेकवादी विचार गावागावात पोहोचवण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
अमरावती शहर शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद तायडे यांचा ‘अंनिस वार्तापत्र’ प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच वार्तापत्राच्या पाच वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त दोन नवीन वर्गणीदारांची नोंद करण्यात आली. अधिकाधिक वर्गणीदार जोडून विवेकवादी विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन मंजू वासनिक यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन खोब्रागडे यांनी मानले. शेवटी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गीत सादर करून सभेचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध उपक्रम विभागाचे जिल्हा कार्यवाह आशिष देशमुख यांनी विशेष समन्वय साधला.
यावेळी अफसर (जिल्हा कार्यवाह, बुवाबाजी संघर्ष विभाग), प्रफुल्ल मंदा श्रीधर, विजय डवरे, सचिन खोब्रागडे, मंजू वासनिक, दिलीप लाडे, मनीष गणेशपुरे, दिगंबर मेश्राम, विजया करोले, सुरज मंडे, मिलिंद तायडे, बबिता वानखडे, नरेंद्र धर्माळे, राजीव बसवनाथे, संदीप हिवराळे, प्रमोद कोळमकर यांच्यासह जिल्हा व शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते.
‘तुकडोजी महाराज ,अंधश्रद्धा निर्मूलन’ परिसंवाद गुरुदेव सेवाश्रम येथे तुकडोजी महाराज अंधश्रद्ध निर्मुलन परिसंवादाचे आयोजन केले जाणार आहे. बैठकीत बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच लेखन-वाचन कार्यशाळा व जनजागृती उपक्रम राबविण्याचाही निर्धार व्यक्त करून नवीन शाखा स्थापनेद्वारे संघटन विस्ताराला प्राधान्य देणे व वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांच्या प्रसारावर भर देण्याबाबत कटिबद्धता व्यक्त करण्यात आली.