![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेचा एकूण निकाल ३८.७२ टक्के लागला आहे. राज्यभरातून १,०२,०५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३९,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४३.८८ टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ३६.११ टक्के आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने ६४.९५ टक्के निकालासह आघाडी घेतली आहे. कला शाखेचा निकाल २१.४० टक्के, वाणिज्य शाखेचा २२.४० टक्के, एमसीव्हीसीचा १८.३४ टक्के आणि आयटीआयचा ३०.४९ टक्के लागला. विभागनिहाय निकालात छत्रपती संभाजीनगर विभागाने ५२.९० टक्के निकालासह राज्यात प्रथम स्थान पटकावले. लातूर विभाग ४६.५३ टक्के आणि नाशिक विभाग ४२.०१ टक्के निकालासह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिले. कोकण विभागाचा निकाल सर्वात कमी २०.९० टक्के नोंदवला गेला, तर पुणे विभागाचा निकाल ३६.९७ टक्के लागला. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी १५ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ४०० रुपये आणि पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय ३०० रुपये शुल्क आकारले जाईल. मंडळाने ही परीक्षा १६ जून ते ८ जुलैदरम्यान आयोजित केली होती. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. मंडळाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुढील परीक्षांसाठी नव्या जोमाने तयारी करावी, असे आवाहन केले आहे.
Source link
बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल 38.72 टक्के जाहीर:विज्ञान शाखेची आघाडी, मुलींनी मारली बाजी