![]()
मागील दशकात विमानतळांच्या पायाभूत सुविधांवर ९६ हजार कोटींचा खर्च झाला. तरी अवघ्या दीड वर्षात झालेल्या १० अपघातांत २८४ प्रवासी ठार झाले आहेत. यामुळेच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) सुरक्षा नियमांचे उल्लंघन, देखभालीतील त्रुटी अन् बेफिक
.
केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाच्या २०२५ च्या वार्षिक अहवालातून या बाबी समोर आल्या आहेत. ‘डीजीसीए’ने वर्षभरात केलेल्या ९७५ सुरक्षा तपासण्यांतून सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.
बारामती रनवे फिकट
अजित पवारांच्या विमान अपघातावेळी बारामती विमानतळावर हवामान अंदाज, वाऱ्याचा निर्देशांक, आधुनिक नेव्हिगेशन साधने तसेच संरक्षक भिंत नसणे, रनवेवरील मार्किंग फिकट झाले होते. तेथे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक एटीसीचे काम करत होते.
विमानसेवा बाधित होण्याची ३ कारणे
१ रिक्त पदांचाही ताण : संसदेत दिलेल्या एका उत्तरानुसार विमानतळ प्राधिकरणात ३८%, डीजीसीएमध्ये ४८% तर एटीसीच्या देशभरात २२% जागा रिक्त आहेत.
२ सायबर हल्ल्याचा धोका : विमानांना बॉम्ब धमक्या आणि सायबर हल्ल्यांचा धोका.
३ ड्रोनचा सुळसुळाट : वर्षभरात १५,६३६ प्रमाणित ड्रोन पायलट तयार असताना विमानतळ परिसरात अनधिकृत ड्रोन उड्डाणांत वाढ झाली आहे.
खर्चात कपात, सुरक्षा धोक्यात
जानेवारी २०२५ ते जून २०२६ पर्यंत देशातील विमान दुर्घटनेत २८४ जण ठार झाले. प्रशिक्षण विमान, हेलिकॉप्टर, चार्टरचे सर्वाधिक अपघात झाले. वाढत्या स्पर्धेमुळे खर्च कमी करण्यासाठी देखभाल व सुरक्षेबाबत तडजोड करत असल्याचे निरीक्षण डीजीसीएने नोंदवले आहे.
महाराष्ट्रात सुरक्षा कडक
राज्याच्या विमानतळांवर एअरसाइड सुरक्षा ऑडिट, ग्राउंड हँडलिंग, सुरक्षा व्यवस्थापनाचे ऑडिट, पायाभूत सुविधांचे निरीक्षण वाढवले. मुंबईत रनवे सुरक्षा निरीक्षण, कमी दृश्यमानतेतील सुरक्षा मजबूत केली. कोल्हापूरला नवीन एटीसी टॉवर उभारले आहे.
विमान फिट असल्याचे प्रमाणपत्र असतानाही अपघात झाले. त्यामुळे हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर संशय व्यक्त होतो. जास्त तापमानात जास्त लगेज असतात. ओव्हरलोडमुळेही अपघात झाले. यासह देशातील अनेक ‘एटीसी’मध्ये प्रशिक्षित अधिकारी हवेत. जसे आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या कंट्रोल टॉवर, रडारचे रेटिंग होते, अगदी तसेच एटीसी हँडलिंग करणाऱ्यांचेसुद्धा नियमित रेटिंग केले जावे.