![]()
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने राज्यभरातील तसेच राज्याबाहेरील विविध आश्रमांमध्ये ११,००० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्वांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्पही केला. सततच्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून, त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर “निसर्गाचे आपण देणे लागतो’ या भावनेतून पर्यावरण संरक्षणासाठी जय बाबाजी भक्त परिवारातर्फे दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते. यावर्षीही राज्यभरातील आणि राज्याबाहेरील विविध आश्रम परिसरात ११,००० पेक्षा जास्त वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. वेरूळ येथील प्रमुख आश्रमात जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या पावन उपस्थितीत शेकडो वृक्षांचे रोपण करण्यात आले. वेरूळ येथील वृक्षलागवड कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक पद्धतीने धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आश्रम परिसरातील विद्यमान वृक्षांना आळे करून पाणी, सेंद्रिय खत देण्यात आले तसेच आवश्यकतेनुसार गोमूत्राची फवारणी करण्यात आली. आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना नारळाची तसेच आश्रमाच्या विविध भागात शेकडो रोपे लावून परिसर अधिक आकर्षक करण्यात आला. या अभियानात मोठ्या संख्येने गुरुबंधू, गुरुभगिनी, गुरुकुलातील विद्यार्थी तसेच भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानही केले. वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारत सर्वांनी पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प केला. दरम्यान, सोमवारी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, पुणे, मुंबई, अहिल्यानर, पंढरपूर, रत्नागिरी यांसह राज्यभरातील विविध जिल्ह्यातील आश्रमांबरोबरच राज्याबाहेरील काशी, खालघाट याबरोबरच विविध आश्रमात वृक्षारोपण झाले. वृक्ष हेच भविष्यातील जीवनाचे आधार: शांतिगिरीजी महाराज जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी पर्यावरण संरक्षण हा प्रत्येकाचा धर्म असून, वृक्ष हेच भविष्यातील जीवनाचे आधार आहेत, असा संदेश देत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणेने जय बाबाजी भक्त परिवार गेली अनेक वर्षे वृक्षारोपण, श्रमदान, जलसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीसारखे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे.
Source link
जय बाबाजी भक्त परिवारातर्फे 11,000 वृक्षरोपांची लागवड:नाशिकच्या विविध तालुक्यांसह राज्यभरातील आश्रमांत वृक्षारोपण