Headlines

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार ही अफवा- संजय राऊत




देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि कायदा त्यांना हटकत नाही. इतकेच नव्हे, तर ते हा चोरीचा माल घेऊन देशाच्या गृहमंत्र्यांकडे जातात आणि त्याला सोन्याचा मुलामा देण्याची मागणी करतात. गृहमंत्रीही त्याला मान्यता देत असतील, तर देशातील कायद्याच्या स्थितीबद्दल मला गंभीर चिंता वाटते, असे म्हणत उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, आम्हाला रामरक्षा वाचता येते की नाही, हा प्रश्न विचारण्यापेक्षा राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. रामरक्षा कशी म्हणायची ते आम्ही बघून घेऊ, सत्ताधाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. मात्र, सध्याच्या सरकारला राम मंदिरातील चोरीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करणे जास्त महत्त्वाचे वाटत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न संजय राऊत म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्ष पुन्हा फुटणार अशा वावड्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक उठवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. भाजप आणि शिंदे गटाकडे सध्या दुसरे कोणतेही काम उरलेले नाही. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच पक्षांतराच्या खोट्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही केवळ त्यांच्या मतदारसंघातील नगराध्यक्षांना बेकायदेशीरपणे बरखास्त केल्याच्या तक्रारीसाठी होती, असे स्पष्ट करत आमदार-खासदार फुटणार असल्याच्या बातम्या त्यांनी फेटाळून लावल्या. बिलाला पाठिंबा देणार ही अफवा डिलिमिटेशन बिलाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, या अधिवेशनात हे बिल येणार की नाही, हे अजून निश्चित झालेले नाही. मागच्या अधिवेशनात यावर चर्चा झाली तेव्हा सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत उपस्थित होते. आम्ही या बिलाला पाठिंबा देणार ही अफवा आहे. दिल्लीत सर्व विरोधक एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे लवकरच पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार राजकारणात व्यस्त संजय राऊत म्हणाले की, सध्या देशात ‘नीट’ पेपरफुटीचा अत्यंत गंभीर मुद्दा गाजतो आहे. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. देशासाठी हे खरे चिंतेचे विषय असायला हवेत, पण सरकार केवळ राजकीय डावपेचांमध्ये व्यस्त असल्याची टीका संजय राऊत यांनी शेवटी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *