![]()
अमरावतीच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या शाब्दिक चकमकींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांचे एक नवे व्हॉट्सअॅप स्टेटस राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे. ‘पुराने पेडो का मजाक उडा रहेथे नये पौधे… इन्होने अभी तुफानो के झटके नही देखे….’ असे सूचक स्टेटस त्यांनी ठेवले आहे. विशेष म्हणजे, गेल्या 24 तासांतील त्यांचे हे दुसरे लक्षवेधी स्टेटस असून, यामधून त्यांनी नेमका कोणावर निशाणा साधला आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. नवनीत राणा यांचा हा टोला पक्षांतर्गत स्वकीयांना आहे की अन्य राजकीय विरोधकांना, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, नुकत्याच आमदार रवी राणा आणि भाजपच्या आमदारांमध्ये उफाळून आलेल्या वादानंतर, नवनीत राणा यांच्याकडून सोशल मीडियावर सातत्याने अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या स्टेटसमागील खरा रोख नेमका कुणाकडे आहे आणि त्यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे, यावरून अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘दुनिया कहती है खेल बदलना मुश्किल है..’ यापूर्वी नवनीत राणा यांनी आमदार रवी राणा यांच्या छायाचित्रासोबत ‘दुनिया कहती है खेल बदलना मुश्किल है, लेकिन मै खेल नही खेल खेलने वाले बदल देता हु….’ असे कॅप्शन असलेले स्टेटस ठेवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. या पहिल्या स्टेटसमधून त्यांनी नेमका कोणाला इशारा दिला याची चर्चा ताजी असतानाच, आता त्यांनी ‘पुराने पेडो का मजाक उडा रहेथे नये पौधे… इन्होने अभी तुफानो के झटके नही देखे….’ असे आणखी एक नवे सूचक स्टेटस ठेवल्यामुळे अमरावतीच्या राजकारणातील या चर्चांना आता अधिकच वेग आला आहे. नवनीत राणांच्या सूचक स्टेटसने वाढवली चर्चा नवनीत राणा यांच्या नव्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये कोणत्याही नेत्याचा किंवा राजकीय पक्षाचा थेट उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्यांचा हा नेमका रोख भाजपमधील स्वकीयांकडे आहे की राजकीय विरोधकांकडे, याबाबत अमरावतीच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या तीन आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. याच ताज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांचे हे नवे स्टेटस समोर आल्याने, त्याचा थेट संबंध या राजकीय वादाशीच जोडला जात आहे. रवी राणा काय म्हणाले होते? या नव्या वादाची ठिणगी आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका वक्तव्यातून पडली. रविराज देशमुख यांचे आमदारकीचे तिकीट कापण्याचे काम मीच केले, असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर भाजपने तातडीने पत्रकार परिषद घेत हा दावा ठामपणे फेटाळून लावला. भाजपच्या शिस्तीनुसार आणि कार्यपद्धतीनुसार उमेदवारीचा अंतिम निर्णय केवळ पक्षाचे संसदीय मंडळच घेते. त्यामुळे कोणत्याही बाहेरील व्यक्तीने पक्षाच्या उमेदवारीबाबत असा दावा करणे पूर्णपणे चुकीचे आणि खोटे असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. भाजप आमदारांचा पलटवार रवी राणा यांच्या या दाव्यावर भाजपच्या स्थानिक आमदारांनी एकत्रितपणे तीव्र संताप व्यक्त करत त्यांना खडेबोल सुनावले. आमदार राजेश वानखडे यांनी स्पष्ट केले की, तिकीट देण्याचा किंवा कापण्याचा अधिकार केवळ वरिष्ठ नेतृत्वाचा असून, पक्षाच्या अंतर्गत विषयात बाहेरील व्यक्तींनी ढवळाढवळ करू नये. आमदार प्रताप अडसड आणि आमदार प्रवीण पोटे यांनीही याच भूमिकेला दुजोरा दिला. उमेदवारीचा निर्णय संसदीय मंडळच घेते, त्यामुळे रवी राणांचा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये म्हणूनच ही पत्रकार परिषद घेतल्याचे या आमदारांनी स्पष्ट केले. ही देखील बातमी वाचा शिवसेनेच्या 6 खासदारांच्या विलीनीकरणावर सुनावणी:पक्षांतरबंदी कायद्याचे थेट उल्लंघन असल्याचा ठाकरे गटाचा दावा, सुप्रीम कोर्टात काय घडले? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेले विलीनीकरण बेकायदेशीर असल्याचा दावा करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लोकसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणाला दिलेल्या मंजुरीला आव्हान देत, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ही याचिका दाखल केली आहे. या महत्त्वपूर्ण याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. इथे सविस्तर वाचा
Source link
'पुराने पेडो का मजाक उडा रहेथे नये पौधे…':नवनीत राणांचे स्टेटस चर्चेत, रवी राणा आणि भाजपमधील वादानंतर नेमका रोख कोणावर?