Headlines

एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल!:चाकण दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याची मागणी, सरकारवर घणाघात




पुण्याच्या चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी, खड्डे आणि खराब रस्त्यांच्या दुर्दशेमुळे 20 लघुउद्योगांनी आपले उद्योग राज्याबाहेर हलवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज चाकणमधील खड्डे आणि पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि येथील परिस्थिती सुधारण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या डॅशिंग अधिकाऱ्याची मागणी केली. याच दौऱ्यात शिवसेना (ठाकरे गट) आमदार बाबाजी काळे यांनी अचानक अर्ध्यातूनच काढता पाय घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी द्या, हे सगळं सुधारेल चाकणमधील भीषण वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांवरून प्रशासनावर ताशेरे ओढताना आदित्य ठाकरे म्हणाले, “येथील एमआयडीसीत वीज, पाणी आणि रस्ते चांगले नाहीत. कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ट्रॅफिकमुळे आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. इथं सत्तेतल्या आमदाराचेही ऐकले जात नाहीये. आज राज्यात चांगले अधिकारी नाहीत. इथली परिस्थिती सुधारण्यासाठी ‘एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल’ आणि ती व्यक्ती म्हणजे तुकाराम मुंढे. त्यांच्यासारखे चांगले अधिकारी इथे दिले पाहिजेत.” मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांवर निशाणा चाकणच्या प्रश्नावरून ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले. “राजकीय नेत्यांचा दौरा ठरल्यावरच इथल्या रस्त्यांची डागडुजी केली जाते. उद्योगमंत्री उदय सामंत उद्या रविवारी येणार आहेत. मी त्यांना आवाहन करतो की रविवारी येऊ नका, कामाच्या दिवशी या. मोठा ताफा घेऊन न येता सामान्य माणसाप्रमाणे या, म्हणजे इथले खरे चित्र दिसेल.” मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात की जे उद्योग बाहेर जात आहेत, ते बंद पडणारे आहेत. त्यामुळे फरक पडणार नाही. पण मग त्यामुळे जो रोजगार जाणार आहे, त्याचे काय? मुख्यमंत्र्यांना त्याची चिंता नाही. इथल्या खराब रस्त्यांमुळे मला आज पोहोचायला दीड तास अधिक लागला. त्यांचे या प्रश्नांकडे लक्षच नाही.” आमदार बाबाजी काळे दौऱ्यातून अर्ध्यातूनच गायब; चर्चांना उधाण आदित्य ठाकरेंच्या या महत्त्वपूर्ण चाकण दौऱ्यादरम्यान एक राजकीय खळबळ उडवून देणारी घटना घडली. खेडचे शिवसेना (ठाकरे गट) आमदार बाबाजी काळे हे हा दौरा अर्धवट सोडून अचानक निघून गेले. एमआयडीसीच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच बाबाजी काळे दौंडमधील यवत येथे एका लग्नासाठी गेल्याचे कारण सांगून निघून गेले. काही दिवसांपूर्वी भीमाशंकर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काळे यांची भेट झाली होती. मुख्यमंत्र्यांनी काळे यांना काही ‘ऑफर’ दिली होती का? आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यातून असा अचानक काढता पाय घेतला का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. भोंदूबाबा प्रकरणावरून एकनाथ शिंदेंना टोला पुण्यातील भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेच्या प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नावरही आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. “ज्या राज्यात स्वतः उपमुख्यमंत्री आणि अन्य लोक अंधश्रद्धेतून बोट कापतात किंवा अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात, त्या राज्यात दुसरं काय होणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. हेही वाचा… गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते?: पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या- माझे वडील कमळात जन्मले अन् कमळातच विसावले भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत, आता दिवंगत नेत्याच्या जुन्या राजकीय घडामोडींवर चर्चा करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. हेही वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *